मच्छे येथील घरांमध्ये शिरले पाणी : नागरिकांची तारांबळ : गटारी साफ न केल्याने पाणी रस्त्यावर
वार्ताहर /किणये
गेल्या दहा-बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी व गुरुवारी तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. उघडीपीनंतर झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. संततधार पावसामुळे मच्छे येथील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे तालुक्यात भातरोप लागवडीच्या कामांना पुन्हा जोर आला आहे. हा पाऊस भात, भुईमूग, रताळी आदी पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे शेतकऱयांनी सांगितले.
बुधवारी व गुरुवारी दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे शेतशिवारांमध्ये पुन्हा पाणी साचू लागले आहे. पावसाअभावी शेतामधील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे पॉवर टिलरच्या साहाय्याने रोप लागवड करण्यासाठी चिखल करण्याची कामे पूर्णपणे थांबली होती. तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही 60 टक्के भातरोप लागवडीची कामे शिल्लक आहेत.
पावसामुळे मच्छे येथील लोहार गल्लीत पाणी आले. हे पाणी महादेव लाड व अन्य काही जणांच्या घरात शिरले. या गल्लीतील गटारींची साफसफाई करण्यात आली नाही. या गटारींच्या नियोजनाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. पावसाचे पाणी महादेव यांच्या घरात शिरल्याने भात, वाटाणा व जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले आहे, अशी माहिती गल्लीतील नागरिकांनी दिली.