नागरिकांना थंडावा, मात्र शेतीचे अतोनात नुकसान, झाडे, घरांची पडझड, वीज पुरवठा खंडित
प्रतिनिधी /पणजी
राज्याला अवकाळी पावसाने सोमवारी पुन्हा एकदा येथेच्छ झोडपून काढले. दिवसभर उकाडय़ाने अंगाची लाहीलाही झाल्याने सायंकाळी पडलेल्या पावसाने तमाम नागरिकांना दिलासा मिळाला खरा मात्र कृषी क्षेत्राची मोठय़ा प्रमाणात हानी झाली.
उत्तर कर्नाटकात मोठय़ा प्रमाणात पावसाचे ढग जमले आणि ते पश्चिमेच्या दिशेने म्हणजेच गोव्याकडे सरकले. त्यामुळे काणकोण, सांगे, धारबांदोडा, केरी, सत्तरी असे करुन पाऊस सांखळी, डिचोली, म्हापसा, जुने गोवे, फोंडा, मडगाव, वास्को, पणजी मिळून संपूर्ण गोव्यात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. तर काही भागात रात्री उशिरा तासभर पाऊस सुरु होता.
या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. जोरदार वादळी वाऱयासह पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडे पडली व वीज प्रवाह पूर्णतः खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागात वीज पुरवठा पूर्णतः बंद होता. प्राप्त माहितीनुसार, वास्को येथे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे दाबोळी विमानतळावर येणारी अनेक विमाने उशिराने आली. या पावसामुळे गोव्यातील शेती, बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. विशेषतः काजू व आंबा बागायतदार पूर्णतः अडचणीत आलेले आहेत.
गेले चार महिने सातत्याने दर महिन्याला अधून मधून पाऊस पडत असल्यामुळे आंबा पिकावर अत्यंत विपरीत परिणाम झालेला आहे. यातून वाचलेले काही आंबे झाडावर लटकलेले असताना गेले तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे आंब्यांच्या एकंदरित उत्पादनावर वाईट परिणाम झालेला आहे. सोमवारच्या वादळयुक्त पावसामुळे झाडांवर लटकलेले अनेक आंबे झडून गेले. तर काजू बागायतदारांवर संकटच कोसळलेले आहे. यावर्षी काजूचे उत्पादन निम्यापर्यंत आलेले आहे. त्यातच पावसामुळे फेणी उत्पादकांना देखील यावर्षी नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच होती.