भातपिकांना दिलासा : नदी-नाले तुडुंब : बळ्ळारी नाला परिसरात पूरस्थिती : काही ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी : वाहतूक विस्कळीत
वार्ताहर /किणये
तालुक्याला सोमवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस होत असून सोमवारी या पावसामध्ये वाढ झाली. दिवसभर संततधार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, फुलांवर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर तालुक्मयाच्या सर्रास भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वच पिकांमध्ये पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे शिवारातील कामे ठप्प झाली आहेत.
खादरवाडी डोंगर परिसरातून आलेले व नाल्याचे पाणी पिरनवाडी येथील सिद्धेश्वर गल्ली, कालिका नगर येथील काही नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आहे तसेच पिरनवाडी येथील शिवाजी महाराज चौक जवळील काही जणांच्या घरात पाणी शिरले ते पाणी काढेपर्यंत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. मच्छे येथील लोहार गल्लीमध्ये नाल्याचे स्वरूप आले होते. नगरपंचायतीला वारंवार सांगूनही या गटारींची साफ-सफाई करण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकातून होत आहेत.
भातपीक कुजून जाण्याची भीती
तालुक्मयाच्या इतर भागापेक्षा पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पश्चिम भागातील बेनकनहळ्ळी मुख्य रस्त्यावर, केंबळी नाला परिसर व ब्रह्मलिंग मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. केंबळी नाला परिसरातील शेतांमध्ये पाणी साचून भात पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे भातपीक कुजण्याची भीती शेतकऱयांना लागली आहे.
राकसकोप धरणाचा एक दरवाजा खुला
राकसकोप धरणाचा एक दरवाजा खुला केल्यामुळे मार्कंडे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राकसकोप, येळेबैल, सोनोली, बेळगुंदी आदी भागातही पाणी साचले आहे.
सध्या तालुक्मयात भातरोप लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र शिवारात अधिक पाणी साचल्यामुळे लागवडीची कामे खोळंबली आहेत अशी माहिती शेतकऱयांनी दिली.
पश्चिम भागात रताळी लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. या रताळी पिकांमध्ये ही पाणी साचलेले आहे तसेच मुंगेत्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिरनवाडी मच्छे बेळगुंदी आदी रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी आले होते यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
येळ्ळूर परिसरात दमदार
येळ्ळूर परिसरात सोमवारी दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. दमदार पाऊस कोसळल्यानंतर परिसरातील नाले तुडुंब भरून वाहात होते. याचबरोबर शिवारातही पाणी साचून राहिले होते. काही भागामध्ये अधिक पाणी झाल्यामुळे शेतकऱयांनी ते पाणी काढण्यासाठी धडपड सुरू केली होती.आता पुन्हा दमदार पाऊस झाल्याने येळ्ळूर परिसरातील शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येळ्ळूरबरोबरच सुळगा, राजहंसगड, अवचारहट्टी, देसूर या परिसरातही पाऊस कोसळला आहे. त्यामुळे सध्या तरी या सर्व भागाला या पावसाचा मोठा फायदा झाला आहे. अरवाळी धरणातील पाणीसाठय़ामध्येही वाढ झाली आहे. अरवाळी धरणापासून उगम पावलेल्या लेंडी नाल्याचा प्रवाह वाढला असून ते पाणी थेट बळ्ळारी नाल्याला जात आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱयांना फटका बसला आहे.
या भागातील भातपिके सध्या तरी जोमात आहेत. खताची मात्रा देण्यासाठी देखील शेतकरी धडपडत आहेत.
बेकिनकेरे-गोजगा रस्त्यावर पाणी
बेकिनकेरे-गोजगा संपर्क रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अतिपावसामुळे शिवार जलमय झाले आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. मागील दोन-तीन वर्षापासून पावसाळय़ात या मार्गावर पाणी येत असल्याने वाहनधारकांबरोबर शेतकऱयांना शेतीकडे जाणे कठीण झाले आहे. संबंधित खात्याने रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
मार्कंडेय नदी भागातील पिके पाण्याखाली
येथील मार्कंडेय नदीला पूर येवून पाणी दुसऱयांदा पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नुकतीच लागवड करण्यात आलेली भातरोपे पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेचे आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी नदीकाठच्या शेतकऱयांनी भातरोप लागवडीची कामे पूर्ण केली होती. तितक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी येऊन नदीकाठची भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भातरोपे कुजून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर या पुरात भातरोपे कुजली तर पुन्हा भातरोपे लागवड करणे अशक्य आहे. माळरानातील पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. कंग्राळी बुदुक, काकती, होनगा भागातही दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
बेनकनहळ्ळी नाल्यानजीक भात-भाजीपाला पाण्याखाली
बेळगाव राकस्कोप रस्त्यावरील बेनकनहळ्ळी नाल्याजवळील पुलावर पाणी आले असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. पाऊस असाच सुरू राहिल्यास मंगळवारपासून हा रस्ता पूर्णपणे ठप्प होण्याची शक्मयता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. या परिसरातील भात व भाजीपाला पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
खानापूर तालुक्यात पावसाचा जोर
कणकुंबीत दोन घरांची पडझड : आज मोहरमनिमित्त शाळांना सुटी
गेल्या चार दिवसांपासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारपासून पावसाने जोर धरला असून गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. या पावसामुळे सर्वच पिकांना दिलासा मिळाला असून भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भातरोप लागवड रखडली होती. गेल्या तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे भातरोप लागवडीला जोर आला असून भातरोप लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र या पावसामुळे रोगाचे सावट दूर झाले आहे.
रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांनी शाळांना सुटी जाहीर केली. त्यामुळे आज तालुक्यातील शाळा भरल्या नाहीत. मंगळवारी मोहरमनिमित्त सरकारी सुटी असल्याने आजही शाळांना सुटी मिळणार आहे.
जोरदार पावसामुळे पुन्हा घरांची पडझड सुरू झाली आहे. कणकुंबी येथील शशीकांत नाईक यांचे राहते घर झालेल्या पावसात कोसळले आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, पीडीओ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच विलास नाईक यांच्या घरची भिंतही कोसळली आहे..
जांबोटी-कणकुंबी भागात संततधार
गेल्या चार दिवसापासून जांबोटी-कणकुंबी भागात संततधार पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान पसरले असून या पावसामुळे रखडलेली भातरोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.
भातरोप लागवड अंतिम टप्प्यात
या भागातील शेतकरी वर्गानी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून भातरोप लागवडीला प्रारंभ केला होता. गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे लागवडीची कामे ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला होता. भातरोप लागवडीसाठी पावसाची गरज असते. मात्र लागवडीच्या ऐन हंगामातच पावसाने ओढ दिल्यामुळे रोप लागवडीवर प्रतिकूल परिणाम होऊन भात रोपांची वाढ खुंटली होती. तसेच भात रोपावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
बळीराजा सुखावला
अपेक्षेप्रमाणे गेल्या चार दिवसापासून या भागात पावसाला सुरुवात झाल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतकरी वर्ग राहिलेल्या भातरोप लागवडीची कामे पूर्ण करण्यात गुंतला असून काही ठिकाणी भांगलणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली असून एकंदरीत हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
पूर्व भागात नदी-नाल्यांना पूर
रविवारपासून पावसाचा जोर वाढल्याने पूर्व भागातील सर्व नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे परिसरातील शेती जलमय झाली आहे.
बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा, पंत बाळेकुंद्री, सुळेभावी, मारीहाळ आदी भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारपासून तर कहरच केला असून, बळळारी नाल्यासह परिसरातील इतर नाल्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे शेती जलमय झाली आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पूर्व भागामध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. पावसाच्या लहरीपणाचा पूर्व भागातील शेतकऱयांना फटका बसण्याची शक्मयता आहे. तीन वर्षांपूर्वी या भागातील सर्व नाल्यांना पूर आला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.
पिरनवाडी नाका परिसरात घरांमध्ये शिरले पाणी
पिरनवाडी नाका परिसरात दमदार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. नाला सफाई न केल्यामुळे तसेच नाल्यावर अतिक्रमण झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील साहित्य काढण्यासाठी महिला व मुलांची धडपड सुरू होती.
या घटनेची माहिती पिरनवाडी नगरपंचायत अधिकारी पत्तार व साहाय्यक अभियंते गडाद तसेच तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व या परिसरातील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना केली. पावसाचा जोर सुरू राहिल्यामुळे खानापूर महामार्गावरही पाणी साचले होते. पिरनवाडी परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिले होते.
बेळवट्टी शाळेची संरक्षक भिंत कोसळली
बेळवट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेची भिंत पावसात कोसळली. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चित भागात होणाऱया मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री भिंत कोसळली असून सोमवारी सकाळी भिंत कोसळल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
शाळा बंद असताना व रविवारी रात्री भिंत कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
एसडीएमसी अध्यक्ष गजानन देसाई, मुख्याध्यापक एम. के. नागन्नवर, ग्रा. पं. सदस्य बाबू पाटील, इराप्पा चांदीलकर आदींनी शाळेला भेट देवून पाहणी केली.