ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावर गुरुवारी रात्री सरकारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन पायलटचा मृत्यू झाला असून, तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (helicopter crash at raipur airport 2 pilots dead)
मिळालेल्या वृत्तानुसार, रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावर रात्री 9.10 च्या सुमारास लँडिंग करताना सरकारी हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर जमिनीवर वेगात आदळल्याने हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेले पायलट ईपी श्रीवास्तव आणि कॅप्टन पांडा हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री उशिरापर्यंत हेलिकॉप्टरचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू होतं. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर रायपूर राज्य सरकारचं असून, नियमित सरावाच्या वेळी ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातामुळे रायपूर विमानतळावरील नियमित उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विमानतळ संचालकांकडून सांगण्यात येते.