शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शिक्षण देणाऱया संस्था म्हणजे सरस्वतीचे मंदिर आहे. जेव्हा पाटी-पेन्सिल अस्तित्वात होती तेव्हा विजयादशमीला काळय़ाभोर पाटीवर पांढऱया शुभ्र लेखणीने सरस्वती रेखाटत आणि तिची पूजा करत. देवी सरस्वतीच्या आवडीचा नैवेद्य, फुले, फळे, वस्त्र, अलंकार असे काहीही प्रचलित नाही. कारण ज्ञानाची उपासना ही तिची मुख्य पूजा आहे. परिग्रह, विरक्ती, शांती आणि ज्ञान हे तिचे सौंदर्य व ऐश्वर्य आहे. आत्मज्ञानाकडे होणारा माणसाच्या बुद्धीचा संपूर्ण विकास हे तिचे प्रधान रूप आहे. सरस्वती देवीच्या फारशा अवतारकथा आढळत नाहीत; कारण तिचे प्रकटीकरण हे अशारीर तेजोमय रूपात होते. स्वर, नाद, शब्द, वाणी, मेधाशक्ती, स्मरणशक्ती, कला, विज्ञान हे तिच्या अवताराचे स्वरूप आहे. गंगा, यमुना, सरस्वती या तीन पवित्र नद्या आहेत. गंगायमुना यांचा प्रवाह दृष्टीस पडतो. सरस्वतीचा प्रवाह गुप्त आहे. गंगेचा धवल प्रवाह आणि यमुनेचा कृष्ण प्रवाह यात सरस्वतीचे मनोमीलन आहे. तिथे ती अदृश्य रूपात वास करते. तिचे रूप स्थूल नसून सूक्ष्म आहे. तिच्या पुत्रांच्या वाणीवर ती गुप्त रूपाने अवतरते तेव्हा तिचा आविष्कार हा समाजमनावर अधिराज्य गाजवतो.
संतश्रे÷ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गणेशवंदनेनंतर श्री शारदेला नमन करतात. ‘आता अभिनव वाग्वीलासिनी, जे चातुर्यार्थ कलाकामिनी, ते श्रीशारदा विश्वमोहिनी, नमिली मियां’ श्री शारदेला ते विश्वमोहिनी म्हणतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर म्हणतात, ही शारदा विश्वमोहिनी कां? तर तिला भाषा व प्रांत यांचे बंधन नाही. संपूर्ण विश्वात तिचा अधिवास आहे. समर्थ रामदास स्वामी ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असे म्हणत नंतर शारदेला वंदन करून म्हणतात, ‘नमू शारदा मूळ चत्वार वाचा’. श्री शारदा ही परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींचे मूलस्थान आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हा ती निश्चल, निस्पंद होती. परब्रह्माची सृष्टी स्फूर्तीने गतिमान करण्याचे मूळ कार्य सरस्वतीने केले. तिचा हुंकार म्हणजे ओंकार. त्यातून नाद. नादातून शब्द आणि शब्दातून भाषा निर्माण झाली. स्वामी मुक्तानंदांनी याचे विवरण केले आहे. ते अभ्यासले की आकलनशक्तीप्रमाणे थोडेफार ज्ञान होते. ते म्हणतात, ‘अक्षरांना आणि शब्दांना जन्म देणाऱया शक्तीला मातृकाशक्ती हे नाव आहे. मातृका म्हणजे अक्षरे. अक्षरांचा शब्द बनतो. शब्दांचे वाक्मय. वाक्मयाला अर्थ असतो. अर्थामुळे चांगला किंवा वाईट परिणाम घडून येतो. अस्वस्थ करणारा विचार मनात खळबळ उमटवतो, तर चांगल्या विचारांनी आनंद होतो. अक्षरांच्या योगाने माणसाच्या मनाची आंतरस्थिती बनत असते.’ परावाणीत शब्दांचा उगम होतो तेव्हा ते सूक्ष्मरूप अभेद स्थितीत असतात. नाद निर्माण होऊन ते पश्यंतीमध्ये प्रवेश करतात. नंतर कंठस्थानी मध्यमेत येऊन शब्दरूप साकारते आणि वैखरीद्वारा ते जिभेवर अवतरतात व उच्चारले जातात आणि ऐकू येतात. आपल्याला शास्त्राचा अर्थ समजतो तो गणेश कृपेने. समजलेला अर्थ शब्दरूपाने दुसऱयांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शारदा करते, असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
एकदा प्रजापतीने सिद्ध देवतांसह ज्ञान, चर्चात्मक यज्ञ केला. सर्व ज्ञानी पुरुष व प्रजापती यांची खोल ज्ञानात्मक चर्चा सुरू असताना तिथे प्रत्यक्ष वाग्देवी प्रकट झाली. तिचे सौंदर्य, मधुर वाणी, अगाध ज्ञान बघून देवांना तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली. सरस्वतीने मात्र प्रजापतीला निवडून म्हटले, ‘तुमच्या सोबत राहायला मिळाले तर माझा जीवनविकास होईल.’ वाग्देवी व प्रजापती तत्त्वज्ञानाचे चिंतन व विचारांची देवाणघेवाण करीत एकत्र आनंदाने राहू लागले. एक दिवस वाग्देवी म्हणाली, आपण जो आत्मानंद मिळवत आहोत तो मानवालाही मिळायला हवा. त्यासाठी या ज्ञानसंपन्न शक्तीकडून मला एक पुत्ररत्न हवे आहे. तिची इच्छा पूर्ण झाली आणि ‘अत्री’ हा प्रभावी तेजस्वी बालक जन्माला आला. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, ‘अत्रीकुल ही शक्ती निर्माण करणारी वाग्देवता आहे. अत्रीने ज्ञान उत्क्रांत केले. पशुत्व कमी करून मानव म्हणून जगायला शिकवले. आपल्या कल्पनेत सुद्धा बसणार नाही एवढे प्रचंड कार्य त्यांनी केले.
आद्य शंकराचार्यांनी जिव्हा प्रार्थना हे छोटे स्तोत्र लिहिले. सगुण देवतांवर प्रभावी स्तोत्र रचना करणाऱया शंकराचार्यांनी शरीरातील इंद्रियावर स्तोत्र कां लिहावे बरे? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. जिभेवर सूक्ष्म रूपाने देवी सरस्वतीचा वास असतो म्हणून शंकराचार्य जिभेची प्रार्थना करतात. तिला ते ‘मत्प्रयि सखी’ असे संबोधतात. तू माझी आवडती मैत्रीण आहेस. तुला मी नमस्कार करतो. तू माझ्यावर दया कर. निंदा न करता ओम नमः शिवाय हा मंत्र म्हण. तू ‘वाणीगुणानुनिलये’ आहेस. ओज, प्रसाद, माधुर्य, सत्यत्व हे वाणीचे अर्थात सरस्वतीचे गुण तुझ्या ठिकाणी विराजमान आहेत. तू लोकांच्या अवगुणांची चर्चा करू नकोस. पक्वानाची अभिलाषा सोडून तू परमेश्वराचे नाम घे. रसने, तुला कळकळीची विनंती की तू इष्ट देवतेच्या नामाचा आनंद घे. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी दिलेला सरस्वतीचा सिद्ध मंत्र असा आहे- ‘नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे / वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव’. समर्थ रामदास स्वामी पंचायतानातील श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या चरित्रातील एक कथा मोठी उद्बोधक आहे. रंगनाथ स्वामींचा पुतण्या खंडोबा हा हुशार होता, परंतु त्याच्याजवळ सभाधीटपणा नव्हता. एक दिवस लोकांनी त्याची टिंगल करून त्याचे मन दुखावले. खंडोबाची लोकांनी चेष्टा केली हे रंगनाथ स्वामींना कळताच त्यांनी एक काडी घेतली. खंडोबाला जीभ बाहेर काढायला सांगितली आणि त्यावर ‘श्री’ हे अक्षर लिहिले. रंगनाथ स्वामी खंडोबाला म्हणाले, ‘तू आत्ता असाच देवळात जा आणि कीर्तन कर.’ त्यानंतर खंडोबाने मध्यरात्र उलटून जाईपर्यंत अपूर्व कीर्तन केले. त्यामुळे खंडोबाचा श्रीधर झाला. हेच ते श्रीधर स्वामी नाझरेकर. त्यांनी पाऊण लाखावर रचना केली आहे. श्री शिवलीलामृत, पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय हे त्यांचे लोकप्रिय ग्रंथ असून श्रद्धेने त्याचे पारायण केल्यास मनोकामना पूर्ण होते.
एक यक्षप्रश्न असा आहे- प्रवासातील खरा सोबती कोण? उत्तर आहे विद्या. ही विद्या माणसाजवळचे गुप्तधन आहे. त्याची चोरी होऊ शकत नाही. ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. विद्येची शोभा विनम्रता आहे. विद्या माणसाचे जगणे उन्नत करीत त्याला जन्ममरणाच्या फेऱयातून मुक्त करते. म्हणून समर्थ रामदासस्वामी शारदेला ‘मोक्षलक्ष्मी’ म्हणतात. सरस्वतीचा वास वाणीवर असला तरी स्थान विशुद्ध चक्रापाशी कंठाजवळ आहे. रामायणामध्ये श्रीराम-भरतभेट अजरामर आहे. कैकयीमातेला कठोर शब्द बोलल्यामुळे भरताचे विशुद्ध चक्र दूषित झाले होते. ते गळामिठी घालून श्रीरामांनी शुद्ध केले. मोर आणि हंस हे सरस्वतीचे वाहन आहे. मोर हे विरक्तीचे, तर हंस हे विवेकाचे प्रतीक आहे. पुस्तकवीणाधारिणी, श्वेतांबरा सरस्वतीशिवाय मंगल कार्याची सुरुवात होत नाही. बुद्धीमधील जडत्व दूर करणाऱया सरस्वतीची प्रार्थना रोजच करायला हवी.
-स्नेहा शिनखेडे