54 हजार किलोमीटर जलवाहिनीतील अडथळे दूर : नवीन तंत्रज्ञानाचे एलअॅण्डटी कंपनीला मोठे सहकार्य
बेळगाव : जलवाहिनीतील अडथळे दूर करण्यासाठी रोबोट तंत्रज्ञानाची मदत होऊ लागली आहे. आतापर्यंत 54 हजार किलोमीटर जलवाहिनीतील दूषित पाण्याचे अडथळे दूर करण्यात आले आहेत. शहर परिसरातील दूषित पाण्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचे एल&टी कंपनीला मोठे सहकार्य मिळाले आहे. विविध विकासकामांसाठी जलवाहिनी नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शहरात दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. यासाठी एल&टीकडून रोबोट तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे जलवाहिनीतील दूषित पाणी आणि गळत्या दूर करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञान एल&टीसाठी आधार ठरू लागले आहे. जलवाहिनीतील पाणी ठप्प होणे, दूषित पाणी येणे याबाबत समस्या शोधून त्यावर अचूक उपाय केले जात आहेत. शिवाय याबाबतची समस्या संगणकाच्या स्क्रीनवरही दिसते. त्यामुळे एल&टीला जलवाहिनीतील अडथळा दूर करण्यास मदत होऊ लागली आहे. या तंत्रज्ञानामुळे दररोज दीडशे मीटर पाईपमधील अडथळे तपासले जातात. शिवाय दूषित पाणी शोधून समस्येवर मात केली जात आहे.
नादुरुस्त बोअरवेलची दुरुस्ती
विशेषत: मागील पाच महिन्यांत या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 20 हून अधिक नादुरुस्त बोअरवेलची दुरुस्तीही करण्यात आली. यापूर्वी हुबळी, धारवाड, कलबुर्गी आदी महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही याचा वापर झाला आहे. शहरात विविध ठिकाणी रस्ते, गटारी, ड्रेनेज आदींसाठी खोदाई केली जाते. त्यामुळे जलवाहिन्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांमुळे शहरात दूषित पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हे रोबोट तंत्रज्ञान यशस्वी ठरू लागले आहे. उत्तराखंडमधील बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेतही या रोबोट तंत्रज्ञानाचा वापर झाला होता. शहरातील 24 तास पाणीपुरवठा यंत्रणेतही या रोबोटचा वापर होणार असल्याची माहिती एल&टी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दूषित पाण्याची समस्याही कमी
शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत अडचणी येऊ लागल्या आहेत. मात्र, रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करून त्या सोडविल्या जात आहेत. तुंबलेल्या जलवाहिनीतील समस्या दूर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दूषित पाण्याची समस्याही कमी केली जात आहे.
– धीरज उभयकर (एल&टी मॅनेजर)