छत्तीसगडमधील भागात अनोखी परंपरा
भारत स्वतःचे वेगवेगळे सण आणि प्रथा-परंपरांसाठी जगभरात ओळखला जातो. याच सणांमध्ये रक्षाबंधनचा समावेश होतो. हा सण भावाबहिणीच्या पवित्र नात्याला दर्शविणारा आहे. रक्षाबंधनदिनी बहिण स्वतःच्या भावाला राखी बांधून स्वतःच्या रक्षणाचे वचन मागते. याचबरोबर बहिणी भावाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात.
परंतु एके ठिकाणी बहिणी भावांना मरण्याचा शाप देतात. भावांना शाप दिल्यावर बहिणी यासाठी प्रायश्चित देखील करतात. ही एक परंपरा असून जी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ही अजब परंपरा छत्तीसगडमध्ये पाळली जाते. जशपूर जिल्हय़ातील एका विशेष समुदायाचे लोक याचे पालन करतात. या समुदायाच्या मुली स्वतःच्या भावांना मरण्याचा शाप देतात. या शापानंतर प्रायश्चित म्हणून बहिणी स्वतःच्या जीभेवर काटा टोचून घेत असतात. त्यानंतर विशेष समुदायाच्या मुली भावांना टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात.
पौराणिक मान्यतेनुसार यमराज एकदा पृथ्वीवर अशा व्यक्तीचा जीव घेण्यासाठी आला होता, ज्याच्या बहिणीने कधीच त्याला शाप दिला नव्हता. यमराजाला असा एक इसम भेटला होता, ज्याला त्याच्या बहिणीने कधीच शाप दिला नव्हता. ती स्वतःच्या भावावर खूप प्रेम करायची. यमराजाच्या योजनेचा त्याच्या बहिणीला सुगावा लागताच ती स्वतःच्या भावाला शिव्या अन् शाप देते. यामुळे यमराजांना त्याचे प्राण घेता आले नव्हते अशी पौराणिक कथा या परंपरेसाठी सांगण्यात येते. याचमुळे या अनोख्या अन् विचित्र परंपरेचे पालन या समुदायाकडून केले जात असते.