वीजजोडणी तोडण्याच्या मोहिमेला सुरुवात : 15 दिवसांत भरावे लागणार बिल
प्रतिनिधी /बेळगाव
वेळेत विजेचे बिल न भरणाऱया ग्राहकांना हेस्कॉमने दणका दिला आहे. मागील दोन दिवसांपासून बिल न भरणाऱया ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरात दररोज 100 हून अधिक कनेक्शन तोडली जात आहेत. त्यामुळे बिल दिल्यापासून 15 दिवसांच्या आत ग्राहकांना भरावे लागणार आहे.
महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत हेस्कॉमकडून रिडींग घेऊन बिल दिले जाते. त्यानंतर दि. 15 पासून बिल भरण्यास सुरुवात होते. बिल दिल्यापासून 15 दिवसांच्या आत बिल भरणे गरजेचे असते. परंतु असे होत नसल्याने हेस्कॉमची आर्थिक स्थिती डळमळीत होत आहे. दिवसेंदिवस थकबाकी वाढत असल्याने दंडात्मक कारवाईसह जोडणी तोडण्याच्या सूचना थेट हेस्कॉमच्या मुख्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज किती बिल जमा झाले, किती कनेक्शन्स तोडण्यात आली याची माहिती वरि÷ अधिकाऱयांना द्यावी लागत आहे.
थकीत बिलावर 1 टक्के दराने दंडवसुली
विद्युतबिल दिलेल्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत भरावे लागते. 16 व्या दिवशीपासून हेस्कॉमकडून प्रतिदिन 1 टक्के दराने दंडाची वसुली केली जाते. हा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलात एरिअर्सच्या स्वरुपात देण्यात येतो. 30 दिवसांनंतर वीज कनेक्शन तोडण्यात येते. त्यामुळे वेळेत बिल न भरणाऱया ग्राहकांकडून दंडाची वसुली केली जाते.
रिकनेक्शनसाठी किती दंड?
बिल दिल्यापासून महिन्याभरात न भरल्यास त्या ग्राहकाचे कनेक्शन तोडण्यात येते. त्यानंतर ग्राहकाला हेस्कॉम कार्यालयात जावून रिकनेक्शनसाठी बिल व दंड भरून रिसीट दिली जाते. त्यानंतरच कनेक्शन दिले जाते. यामध्ये जर सायंकाळची वेळ असेल तर एक रात्र अंधारात काढावी लागणार आहे. घरगुती कनेक्शनसाठी 20 रु., कमर्शियलसाठी 50 रु. तर इंडस्ट्रियलसाठी 100 रुपये रिकनेक्शन दंड भरून घेतला जात आहे.
ऑनलाईन बिल भरले तर ‘युटीआर’ नंबर द्या
बरेचसे ग्राहक गुगल पे, फोन पे, पेटीएमसारख्या मोबाईल वॉलेटद्वारे विजेचे बिल भरतात. बऱयाचवेळा बँकेच्या सर्व्हरमुळे हेस्कॉमच्या सर्व्हरला अपडेट होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बिल भरले नाही म्हणून हेस्कॉमचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना बिल पेमेंट केल्यानंतर येणारा ‘युटीआर’ क्रमांक देणे गरजेचे आहे. तो क्रमांक हेस्कॉम कार्यालयात जमा करण्यात येतो. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱया ग्राहकांनी युटीआर क्रमांक ठेवणे गरजेचे आहे.
ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार
वेळेत विजेचे बिल भरणे हे प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. परंतु ग्राहक वेळेत बिल भरत नसल्यामुळे ते जमा करण्यासाठी व कनेक्शन तोडण्यासाठी कर्मचारी व्यस्त राहतात. दुरुस्तीसह सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी नेमलेले कर्मचारी या कामात गुंतल्याने त्याचा कामावर परिणाम होत आहे. यापुढील काळात बिल न भरणाऱया ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– विनोद करूर (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)