ज्या मुद्यांना सर्वसामान्य लोक जीवन जगण्याच्या आव्हानापेक्षा फार मोठे मानत नाहीत अशा मुद्यांवर राजकारण करण्यात राजकारणी वेळ का घालवत असावेत ? असा कोणालाही प्रश्न पडेल. आपले अस्तित्व दाखवण्याची हीच संधी आहे, असे वाटून जर ते तसे करत असतील तर त्यांच्याविषयी फारसे न बोललेलेच बरे. पण, जेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनलेले असताना त्या विषयावर चर्चा करण्याऐवजी नको ते फाटे फोडण्यात नेते धन्यता मानू लागतात तेव्हा त्यांचा समाचार घेणे गरजेचे बनते. पश्चिम महाराष्ट्रातील दोन साखर सम्राट सध्या प्रभू श्रीरामांना मध्ये ओढून वाद घालत आहेत. एक आहेत राजषी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराचे वारस आणि भाजप नेते समरजित घाटगे तर दुसरे आहेत राज्याचे ग्रामविकास मंत्री व कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ. मुश्रीफ श्री राम नवमी दिवशी आपला वाढदिवस साजरा करतात. यावषी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावात श्रीरामाचं नाव घातल्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. मुश्रीफ स्वतःची तुलना प्रभु श्रीरामांशी करत आहेत असे म्हणून घाटगे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत अधिकची माहिती देण्यासाठी घाटगे यांनी मुश्रीफ यांचा जन्म 1954 यावषी झाला असून त्यादिवशी रामनवमी नव्हे तर रंगपंचमी होती असे दाखवणारे पंचांग सादर केले आहे! तर त्यांच्या आरोपाला उत्तर देताना मुश्रीफ यांनी घाटगे यांनी चुकीच्या वषीचा संदर्भ दिला असून राजषी छत्रपती शाहूंचा वारसदार भरकटला असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक या दोन नेत्यांमध्ये राजकीय स्पर्धा आहे. मात्र ही स्पर्धा विधायक कामासाठीच हवी. कारण ते राजर्षींच्या जन्म गावचे नेतृत्व करतात. साखर कारखान्याची एफआरपी एकरकमी शेतकऱयाच्या खात्यावर जमा करण्यासाठी समरजित घाटगे यांनी घोषणा केली आणि कोल्हापूर जिह्यातील सर्व कारखान्यांना एफआरपी एकरकमी द्यावी लागली! राजकीय स्पर्धेचा असा जनतेला फायदा झाला पाहिजे. अशाच पद्धतीने मुश्रीफ यांनी आपल्या तालुक्मयात 400 कोटीची विकास कामे खेचून आणून स्वतःचे वेगळेपण दाखवून दिले आहे. एका बाजूला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी आणि ते व्यवसाय व्यवस्थित चालून कर्जफेड होत आहे का हे पाहण्यासाठी समरजीत घाटगे झटत असतात. दुसरीकडे कुठल्याही गावचा सर्वसामान्य माणूस कितीही गंभीर आजारात मदत मागण्यासाठी आला तर राज्यातील वेगवेगळय़ा धर्मादाय संस्थांकडून लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य आणि उपचार मोफत करून देण्याचे काम वर्षानुवर्षे हसन मुश्रीफ करत आले आहेत. या कार्यासाठी राज्यभर त्यांची ख्याती आहे. मात्र अशा विधायक प्रश्नांवर झटणारे दोन नेते अत्यंत अनुत्पादक बाबीवर आपला वेळ खर्ची घालत आहेत, हे कोणाच्याही मनाला पटणारे नाही. त्यांच्याकडून अशा राजकारणाची अपेक्षाच नाही. कागल हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक संपन्न तालुका आहे. पण तरीही राज्याबाहेरील खासगी दूध संघ देतात तेवढे पैसे इथल्या शेतकऱयांना आपण का देऊ शकत नाही? यावर त्यांचा वाद व्हावा. वास्तविक त्यांच्यातील स्पर्धेने कोल्हापूरचा फायदा झाला पाहिजे. मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या अनेक प्रश्नांबाबत दोन्ही नेत्यांकडून फारशी हालचाल होताना दिसत नाही. परिणामी दोघांच्याही वाढीला मर्यादा पडल्या असून ते कागल गावचे किंवा तालुक्मयाचे नेते झाले आहेत. संपन्न भागातील जनतेचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसाय वरदान ठरला असला तरी या वाढीला एक मर्यादा पडलेली आहे. ती पार करून पुढे जाण्यासाठी हे नेते काही करतील तर प्रभू श्रीराम अधिक आनंदित होतील. मुश्रीफ यांची जन्मतारीख रामनवमीची नसेल तर त्यांनी ओढूनताणून ती साजरी करण्यात अर्थ नाही आणि मुश्रीफ त्या दिवशी वाढदिवस साजरा करतात म्हणून घाटगे यांनी आक्षेप घेण्यातही अर्थ नाही. कोल्हापूरच्या जाहिरात क्षेत्रात काही वेगळं करून दाखवण्याची चढाओढ लागलेली असते. ही कलात्मक चढाओढ असते. त्यातून अनेक आकर्षक जाहिराती समाजासमोर आल्या आहेत. पण, एखादी जाहिरात आक्षेपार्ह वाटली असेल तर, हे चुकीचे झाले, असे पुन्हा कोणी करू नये, असे मुश्रीफ यांनी म्हणून वाद मिटवला पाहिजे होता. मात्र बहुदा नेत्यांना मुंबईच्या नेत्यांकडून प्रेरणा मिळाली असावी. ज्यामुळे राजर्षींच्या भूमीतील विधायकतेला विसरून ते भलताच वाद घालत राहिले नसते. असे वाद कोल्हापुरात होण्यात अर्थ नाही. मुंबईत नेत्याने मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात अचानक आवाज उठवावा आणि गप्प व्हावे, हे वर्षानुवर्षे चालत आहे. बहुधा त्यांनाही काही निर्णय व्हावा असे वाटत नसावे. त्यामुळे ते अधूनमधून बोलत, जुने व्हिडिओ दाखवत राहतात. त्या त्या काळातील राज्यकर्त्यांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतलेले नसते, हेही त्यातून दिसून येते. त्यामुळेच 2018साली फडणवीस यांच्या काळात त्यांनी भोंग्यांवर आवाज उठवला आणि त्यानंतर थेट 2022 साली तोच मुद्दा उचलून धरला आहे. इतके दिवस झोपला होता का? असा प्रश्न विचारल्याने त्यांनी आपल्याच व्हिडिओचा पुरावा सादर करून एक प्रकारे आरोपाला पुष्टी दिली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय काय आहेत हे समजून सांगण्यापेक्षा या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काय करता येईल हे जाहीर केले असते तर ते सुद्धा विधायकतेला धरून असते. नामांतरप्रश्नी शरद पवार यांनी सर्व पक्षीयांचे एकमत घडवले होते, याची आठवण त्यांच्यासोबत आयुष्य काढलेल्या गृहमंत्र्यांना सुद्धा नसावी हे दुर्दैवच. त्यामुळेच आता अमरावतीचे एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणायला चालले आहेत. त्यांच्या आणि आसपासच्या जिह्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन ‘हे राम’ म्हणत असताना त्या प्रश्नाऐवजी त्यांना भोंगा कसा सतावत असावा?
Previous Articleअपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो
Next Article विजयी घोडदौड कायम राखण्यास बेंगळूर प्रयत्नशील
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.