तालिब हुसेन सुरक्षा यंत्रणांच्या जाळय़ात ः जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे यश
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसेन याला किश्तवाड जिल्हय़ातून अटक केली आहे. दहशतवाद्यांच्या ‘ए’ यादीत त्याचा समावेश होता. 17 राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाले. हिजबुल मुजाहिद्दीनने किश्तवाड भागात नव्याने भरती करून आपल्या कॅडरची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यास सुरुवात केली होती. तसेच काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढलेल्या असताना सुरक्षा यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
किश्तवाड जिल्हय़ात हिजबुल दहशतवाद्यांच्या कारवाया रोजच चर्चेत असतात. तालिब हुसेन हा भागात सर्वात जास्त काळ सक्रिय असलेला दहशतवादी आहे. 2016 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. तालिब हुसेन हा स्थानिक गुर्जर जमातीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिजबुलमध्ये सामील झाल्यानंतर तो अनेकदा किश्तवाड जिह्यातील मारवाह आणि दाछनच्या वरच्या भागात शस्त्रांसह फिरताना दिसत होता. यासोबतच या भागात सक्रिय असलेले आणखी काही दहशतवादीही त्याच्या सल्ल्यानुसार वावरत होते.
2016 पासून निशाण्यावर
2016 मध्ये तालिब हुसेन रहस्यमयरीत्या गायब झाला होता. काही महिन्यांनंतर तो दहशतवादी गटात सामील झाल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून सुरक्षा दल त्याच्या मागावर होते. पण प्रत्येक वेळी तो चुकला. तालिबला सक्रिय दहशतवादी घोषित केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. तालिबच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधून हिंसाचाराचा मार्ग सोडून तालिबला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत मागितली होती.
बेंगळूरमध्ये आश्रय घेतल्याची चर्चा
हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर तालिब हुसेन हा किश्तवाडमध्ये बराच काळ सक्रिय होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने कर्नाटक-बेंगळूर येथे आश्रय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार काश्मीर पोलिसांनी इतर यंत्रणांच्या सहाय्याने विशेष मोहीम हाती घेत त्याला ताब्यात घेतल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली. त्याला पकडणे हे मोठे यश आहे कारण हा दहशतवादी राजौरी-पुंछमध्ये पुन्हा सक्रिय झाला होता. तालिबला अटक केल्यामुळे येथील कारवायांना लगाम बसेल, असा दावाही त्यांनी केला.
टार्गेट किलिंगमध्ये सहभागी 47 दहशतवादी मॉडय़ूल नष्ट
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. याबाबत बोलताना आता वातावरण शांत होत असल्याचे दिलबाग सिंह म्हणाले. टार्गेट किलिंगमागे असलेल्यांची ओळख पटली असून संबंधित दहशतवादी मॉडय़ूलवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अशी 47 मॉडय़ूल उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. हत्या प्रकरणांमध्ये सक्रिय सहभाग असलेले बहुतेकजणांना मारले गेले आहे. शस्त्रपुरवठा करणे, बाईकवरून पळून जाण्यास मदत करणे यासारख्या कामांना मदत करणाऱयांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर असल्याचे दिलबाग सिंह यांनी सांगितले. आणखी लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.