काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीती ः सुरक्षा यंत्रणा सतर्क
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काश्मीरच्या राजौरी आणि पुंछमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दहशतवादी लष्करी छावण्या, पोलीस स्थानके किंवा कोणत्याही धार्मिकस्थळावर हल्ला करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इशाऱयानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ठिकठिकाणी शोधमोहीमही हाती घेतली जात आहे. राजौरीमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या चकमकीतील दहशतवादी फरार झाले असून त्यांची संख्या 3-4 असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात त्यांचे दोन साथीदार मारले गेले. या हल्ल्यात लष्कराचे 4 जवान हुतात्मा झाले होते.
सीमेपलीकडून दहशतवाद्यांचे एक पथक राजौरी-पुंछमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये सुमारे 6 दहशतवादी असून ते सर्व लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत. यातील उमर नावाचा एक दहशतवादी मारला गेला आहे. या दहशतवाद्यांना पीओकेमधून पाठविण्यात आले आहे. 2 दहशतवाद्यांचे 3 गट हल्ल्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. यापैकी 2 दहशतवादी ठार झाले असले तरी उर्वरित 4 दहशतवादी अजूनही राजौरीमध्ये लपून बसले असून ते कधीही हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.