उपराज्यपालांच्या विरोधातील सर्व ट्विट हटविण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने आम आदमी पक्ष आणि त्याच्या अनेक नेत्यांना उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्यावर ‘खोटे’ आरोप न लावण्याचा आदेश निर्देश दिला आहे. उच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि त्याच्या नेत्यांना उपराज्यपाल सक्सेना यांच्या विरोधात केलेल्या कथित ‘खोदी घोटाळय़ा’शी निगडित सर्व सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचा निर्देश दिला आहे.
आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी उपराज्यपालांच्या विरोधात केलेल्या वैयक्तिक स्वरुपाचा ट्विटला 48 तासांच्या आत सोशल मीडिया हँडलवरून हटवावेत असे उच्च न्यायालयाने स्वतःच्या आदेशात म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी उपराज्यपाल सक्सेना यांच्यावर 1400 कोटी रुपयांच्या कथित घोटाळय़ात सामील असल्याचा आरोप केला होता.
याप्रकरणी उपराज्यपालांनी आप तसेच त्याच्या 5 नेत्यांकडून 2.5 कोटी रुपयांची भरपाई मागणारी अबु नुकसानीची याचिका दाखल केली होती. याचबरोबर आप नेते आतिशी सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक, संजय सिंह अणि जास्मीन शाह यांना सोशल मीडियावरील खोटे आणि मानहानी करणारे पोस्ट किंवा व्हिडिओ हटविण्याचा निर्देश देण्याची मागणी उपराज्यपालांनी केली होती.