जामीन याचिका फेटाळली
वृत्तसंस्था/ चंदीगड
वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या सहकाऱ्यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अजनाला पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या आरोपांतर्गत आसामच्या दिब्रूगड तुरुंगात कैद अमृतपालचे सहकारी शिव कुमार आणि भूपिंदर सिंह यांची जामीन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांवर गंभीर आरोप असलयाने 8 महिन्यांनंतरही त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला जाऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पोलीस स्थानकावरील हल्ल्याच्या दिवशी आपण अजनाला येथे नव्हतोच. पंजाब पोलिसांच्या कुठल्याही व्हिडिओत आपण दिसून आलेलो नाही. अन्य आरोपीच्या वक्तव्याच्या आधारावर आमच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
अजनाला प्रकरणी पोलिसांनी 18 मार्च रोजी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर अमृतपाल फरार झाला होता. अमृतपालला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थानातही शोधमोहीम राबविली होती. यानंतर अमृतपाल विरोधात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदवत अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. अखेर 36 दिवसांनी मोगा येथील गुरुद्वारामधून अमृतपालला ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून अमृतपाल आणि त्याचे सहकारी दिब्रूगढ तुरुंगात कैद आहेत.