ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारने सैन्यासाठी अग्निपथ (Agneepath) योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा केल्यांनतर दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये (bihar) तरुणांनी रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. योजनेमध्ये काही त्रुटी असल्याचे या तरुणांचे मत आहे. बिहारमध्ये तरुणांनी केलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. तर महामार्गसुद्धा रोखण्यात आले आहेत. अग्निपथ योजनेविरोधात देशभरातील तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून ही योजना रद्द करण्याची मागणी केली आहे. (Agneepath Recruitment Scheme)
संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली, योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये भारतीय लष्कराचे चाहते असा बॅनर घेतला होता. फक्त २५ टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सैन्यातील सेवेसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेमध्ये सैन्यात काम करणाऱ्या तरुणांना चार वर्षांची सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. ४ वर्षांसाठी जवानांची नियुक्त करण्यात येणार आहे. तर यामधील २५ टक्के जवान हे पुढील १५ वर्षांसाठी लष्करी सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे. मात्र ७५ टक्के जवानांना निवृत्ती देण्यात येणार आहे. योजनेतील या नियमावरुन गदारोळ सुरु झाला आहे. बिहारमध्ये यावरून आंदोलन सुरु झालं आहे. युवक रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या योजनांचा निषेध करत असून ही योजना रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारपासून बिहारमध्ये ठिकठिकाणी युवकांनी आंदोलनाला सुरुवात केली असून आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तरुणांनी आक्रमक होत रेल्वेची जाळपोळ केली आहे.
अग्निवीर योजनेवरुन बिहारमधील छपरा जिल्ह्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी सुरुच आहे. बिहारमध्ये अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागले असून रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. एका एक्सप्रेसच्या कोचवर लाठीमार आणि दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातवारण निर्माण झालं आहे.