वृत्तसंस्था/ बेंगळूर
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱया सामन्यात हिमांशू मंत्रीच्या नाबाद शतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने बंगालविरूद्ध पहिल्या डावात 6 बाद 271 धावा जमविल्या. हिमांशू मंत्री 134 धावांवर खेळत आहे.
या सामन्यात मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. बंगालच्या गोलंदाजीसमोर मध्य प्रदेशचे पहिले चार फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बंगालच्या मुकेश कुमारने सलामीच्या दुबेला 9 धावांवर पायचीत केले. मंत्री आणि शुभम शर्मा यांनी दुसऱया गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी केली. प्रामाणिकने शर्माचा 17 धावांवर त्रिफळा उडविला. मुकेश कुमारने पाटीदारला 7 धावांवर झेलबाद केले. कर्णधार आदित्य श्रीवास्तव शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने एक चौकारांसह 10 धावा जमविल्या. मध्यप्रदेशची स्थिती यावेळी 4 बाद 97 अशी होती.
हिमांशू मंत्री आणि रघुवंशी या जोडीने मध्य प्रदेशचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 123 धावांची भागिदारी केली. रघुवंशीने 81 चेंडूत दोन षटकार आणि 8 चौकारांसह 63 धावा जमविल्या. आकाश दीपने रघुवंशीला पायचीत केले. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी आकाश दीपने जैनला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. दिवसअखेर हिमांशू मंत्री 280 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 134 तर पुनीत दाते 9 धावांवर खेळत आहेत. बंगालतर्फे मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी दोन तर शाहबाज अहमद आणि प्रामाणिक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक मध्य प्रदेश प. डाव 86 षटकांत 6 बाद 271 ( हिमांशू मंत्री खेळत आहे 134, रघुवंशी 63, एस जैन 17, शुभम शर्मा 17, श्रीवास्तव 10, मुकेश कुमार 2-45, आकाश दीप 2-56, शाहबाज अहमद आणि प्रामाणिक प्रत्येकी एक बळी).