जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा : गावातील बेरोजगारांना नोकरी देण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
यमनापूर गावचे भाग्य उजळणारी हिंडल्को कंपनी यमनापूर ग्रामस्थांना कुचकामी ठरली असून फॅक्टरी उभारणीवेळी गावची शेकडो हेक्टर सुपीक जमीन गेली. ग्रामस्थ भूमीहीन झाले. परंतु कंपनी प्रशासन बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत आहे. तेव्हा कंपनी व्यवस्थापनाने गावच्या बेरोजगारांना नोकऱया द्याव्यात; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा बैठकीमध्ये देण्यात आला. शिवाजी चौक येथे बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पिराजी पाटील होते.
50 वर्षांपूर्वी यमनापूरच्या पूर्वेला हिंडाल्को कंपनी सुरू झाली. जमीन गेल्यामुळे ग्रामस्थ भूमीहिन झाले. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने प्रत्येक घरातील शेतकऱयांच्या मुलांना रोजगार देण्याची हमी दिली. परंतु मोजक्याच तरुणांना नोकरी देऊन पुढे गावातील सर्व तरुणांना आम्ही संधी देतो या आशेवर झुलवत ठेवले. त्यामुळे पिकाऊ जमिनी गमवाव्या लागलेल्या शेतकरी कुटुंबांची परिस्थिती बिकट बनली.
उडणाऱया धुळीकडे दुर्लक्ष
हिंडल्को कंपनीच्या गाळमातीचा मोठा ढिगारा गावच्या पूर्वेकडे आहे. ऍसीडमिश्रीत धूळ उडू नये म्हणून कंपनीने पाण्याचे स्प्रिंक्लर ठेवलेले आहेत. जोराने वारा सुटला की ही मातीची धूळ गावामध्ये तसेच काकती, गौंडवाड शिवारांमधील पिकावर, ओल्या व सुक्या चाऱयावर उडून येते. यामुळे नुकसान होते. तसेच हा चारा खाल्ल्यामुळे जनावरे आजारी पडत आहेत, अशी खंत जयवंत पाटील, परशराम पाटील, शंकर कोनेवाडी पिराजी पाटील, खाचू पाटील, मुजावर आदींनी व्यक्त केली.
बैठकीला शामराव पाटील, बसवंत पाटील, आप्पासाहेब मुजावर, नागेंद्र निलजकर, रमेश पाटील, किरण पाटील, भैरु कोनेवाडी, परशराम कोनेवाडी, मयूर पाटील, उमेश गावडेकरसह यमनापूर ग्रामसुधारणा पंच कमिटीचे सदस्य, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.