पुणे / प्रतिनिधी :
धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीरदिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या (रविवारी) ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात 30 हजार हिंदू नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल. आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग असणार आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा असेल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्याबंदीसाठी कायद्याची मागणी
धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मोर्चातील प्रमुख मागण्या आहेत.