डिचोली. प्रतिनिधी
नार्वे गावातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर नूतनीकरण हे या सरकारचे मोठे कार्य असून या मंदिराला लगूनच पर्यटन सर्किटची संकल्पना राज्य व केंद्र सरकार साध्य करणार आहे. परंतु हे मंदिर व परिसर सुशोभित करण्याबरोबरच गोवा राज्याचा वैभवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके यांचे नूतनीकरण करून ऐतिहासिक गोवा या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसमोर ठेवणार आहे. या पर्यटन राज्यात आध्यात्मिक पर्यटन बहरावे यासाठी ऐतिहासिक, आध्यात्मिक केंद्रांच्या विकासाकडे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सरकार पाऊल मारत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नार्वे येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते जिर्णोद्धार केलेल्या या मंदिराच्या माध्यामातून या भागातील हिंदू धर्मियांचे रक्षण करण्याचा संकल्प होता. धर्मांतरण करणार नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी तह झाला आणि महाराज परत गेले. त्यांच्यामुळेच गोव्यातील धर्मांतरणाच्या प्रक्रियेला रोख लागली. या मंदिरात इतिहासकार, पर्यटक यावे यासाठी सरकार काम करीत आहेत. राज्य सरकारने नूतनीकरण केलेले हे मंदिर पुढील 100 वर्षे एक भूषण म्हणून राहणार. दिवाडी बेटावर भव्य वास्तू बांधण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
नार्वे डिचोली तालुक्यातील ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्dयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साताराचे आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजू भोसले, जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, देवस्थानचे अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, उपसरपंचा उन्नती पाडोलकर, स्थानिक पंचसदस्य तुकाराम गावडे, पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाई व इतर मान्यवारांची उपस्थिती होती.
या ऐतिहासिक मंदिराचा जिर्णोद्धार म्हणजे गोमंतकीयांचा अभिमान
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी, परकीय आक्रमणांनी जर्जर झालेल्या जनतेला मोठा आधार दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हा अभिमान दिलेला आहे. राज्य सरकारने या मंदिरचा पुन्हा जिर्णोद्धार व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेऊन व हे काम पूर्ण करून मोठी किमया साध्य केलेली आहे. याचा आम्हा सर्व गोमंतकीयांना अभिमान आहे. असे म्हटले.
विकास व आधुनिकीकरणाबरोबरच आध्यात्मिक धार्मिक वृत्ती महत्वाची
सताराचे आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, एक उर्जास्थान म्हणून सप्तकोटेश्वर देवाकडे पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या या जिर्णोद्धारामुळे आज दिसून येत आहे. हे कार्य केवळ दैवी शक्तीमुळे घडू शकते. इतिहासात जाऊन विचार केल्यास साडेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता, त्याच पद्धतीने आजचा सोहळा होत आहे. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावे लागणार. जनतेचे व धर्माचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांप्रमाचेच ते आपले कर्तव्य बजावत आहेत. मंदिरे ही आपली परंपरा आहेत. येथे उर्जा व आशीर्वाद मिळतो. ज्यातून आपण किहीतरी करू शकतो. त्याच विश्वासाने आपण काम करत राहतो. पुढच्या पिढीला आत्मदर्शनाची गरज असून ती या आध्यात्मिक विचारांतून घडणार आहे. आम्हाला विकास व आधुनिकीकरण पाहिजेच परंतु आपली आध्यात्मिक व धार्मिक वृत्ती सोडून चालणार नाही. दोन्ही गोष्टींची सांगड घालून जावे लागणार. महाराजांची हिंदवी स्वराज ही संकल्पना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची होती. म्हणूनच गोव्यातही त्यांच्या कार्याची धग येथेही पहायला मिळत आहे. हा एक वंशज म्हणून आनंद वाटत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील हिंदू मंदिरांची उभारणी जोर धरू लागली आहे. देशात त्यांच्या कार्याप्रमाणेच गोव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे कार्य पहायला मिळत आहे. असे प्रतिपादन केले.