बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने जय्यत तयारी : पोलिसांचा कडक बंदोबस्त
वार्ताहर /कडोली
येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक दसरोत्सव सोमवार दि. 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गावात जोरदार तयारी करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी यात्रेवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱयांद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे.
म्हैसूर दसरोत्सवासारखीच कडोली गावच्या दसरोत्सवाची मोठी ख्याती आहे. ऐतिहासिक काळापासून या श्री कलमेश्वर देवालयाच्या दसरोत्सवाला मोठी परंपरा आहे. या उत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठय़ा संख्येने उपस्थिती लाभलेली असते. परिणामी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस खाते, देवस्थान पंच, ग्रामपंचायत आणि हक्कदारांना कसरत करावी लागत आहे. पोलीस खात्याने सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱयांद्वारे यात्रेवर बारकाईने नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यात्राकाळात बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी आणि काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांनी जादा पोलीस कुमक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी दसरोत्सवाला प्रारंभ होत असून आहे. रात्री श्रीफळ वाढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी खंडेनवमीला भक्तांचा उपवास सोडण्याचा कार्यक्रम तर रात्रभर बन्नी बांधण्यात येणार आहे. बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे पूजा-अर्चा व आरती त्यानंतर सकाळी 10 नंतर बैलजोडींची मिरवणूक पार पडणार आहे. सायंकाळी हक्कदारांच्या धार्मिक विधीनंतर गाऱहाणे घातल्यानंतर बन्नी मोडण्यात येते. सोने लुटल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
पोलिसांचे पथसंचलन
कडोली येथील दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातर्फे शनिवारी पथसंचलन केले. दिवसेंदिवस कडोली दसरा उत्सवात भाविकांची गर्दी वाढत असून, वारंवार अनुचित घटना घडत आहेत. त्यामुळे भाविकांत तणावाचे वातावरण निर्माण होत होते. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने खबरदारी घेतली आहे. शिवाय राज्य राखीव दलाची एक तुकडी, स्पेशल महिला कमांडो, राखीव दलाची एक तुकडी तसेच काकती पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे.
ग्रामीण पोलीस एसीपी गिरीश, काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली कडोली गावातील प्रत्येक sगल्लीत पोलीस दलाचे पथसंचलन केले. पोलिसांच्या या पथसंचलनामुळे हुल्लडबाजी करणाऱया बाहेरील युवकांना चाप बसणार असल्याचे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.