जिह्यातील गड किल्ल्यांच्या वाटय़ाला आली अनास्था : मौजमजेची झाली ठिकाणे
कोल्हापूर / सुधाकर काशीद
पन्हाळ्याला चाललोय… पार्टीला.
विशाळगडला चाललोय… नवस फेडायला.
पारगडला चाललोय……पावसात भिजायला.
रांगण्याला चाललोय….. दोन दिवस टाईमपास करायला.
अशाच अर्थाने गड-किल्ल्यांकडे बघण्याची बहुतेकांची ‘दृष्टी’ झाल्यामुळे या गड-किल्ल्यांच्या मागचा सारा इतिहास दडला गेला आहे. अर्थातच किल्ल्यांच्या वाटय़ाला केवळ अनास्था अन् अनास्थाच आली आहे. कोल्हापूर जिह्यातल्या ज्या गड-किल्ल्यांवरील मातीच्या प्रत्येक कणात इतिहास मिसळला आहे त्या गड-किल्ल्यांचा इतिहासच आता हरवत चालला आहे. ओबडधोबड वास्तू, ढासळलेली तटबंदी असली तरी गड-किल्ल्यांवर चमचमीत खाण्यापिण्याची सोय मात्र हमखास झाली आहे. त्यामुळे गड-किल्ल्यांवर जायचे तर केवळ मौजमजेला…, एवढीच आता त्यांची ओळख उरली आहे.
कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा, विशाळगड, रांगणा, पारगड, भुदरगड, पावनगड हे किल्ले तर केवळ आणि केवळ मौजमजा आणि खाण्या-पिण्यासाठीच प्रसिद्ध झाले आहेत. जरूर काही गड-किल्लेप्रेमी आपल्या परीने गडाच्या दरीत पडलेल्या शिळा आणि ऐतिहासिक तोफा पुन्हा गडावर आणण्यासाठी धडपडत आहेत, जीवाचे रान करत आहेत. पण अशांची संख्या तुलनेत खूप कमी आहे. त्या तुलनेत केवळ जल्लोष आणि मौजमजा हेच डोळ्यासमोर ठेवून गड-किल्ल्यांवर येणाऱयांची संख्या वाढल्याने त्यांच्या वाटय़ाला खूप विचित्र अशी परिस्थिती आली आहे.
पन्हाळगडाच इतिहास म्हणजे शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासावरचा जिरेटोपच आहे. पण आता पन्हाळ्यावर सकाळी-सकाळी काय दिसते? सकाळी सात वाजता गडावर ‘पर्यटक’ येण्यास सुरुवात होते. त्या पर्यटकांत काही शाळकरी मुली असतात. वाईट असे की, काहीजणी युनिफॉर्मवर येतात. तोंडाला, डोक्याला ओढणी गुंडाळून ठेवतात. एका वेगळ्या वयात त्या भान विसरतात. मित्रांबरोबर येतात, पुन्हा अकरा वाजेपर्यंत थांबून शाळा किंवा कॉलेजला जाऊन आल्यासारखे पुन्हा घरी जातात.., हे रोज सुरू आहे. याशिवाय पन्हाळ्यावर चमचमीत खायला, प्यायला मिळते म्हणून येणारा एक वर्ग आहे. केवळ टाईमपास किंवा सुट्टी एन्जॉय करणारा आणखी एक वर्ग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने पन्हाळा बहरला पाहिजे हे ठीकच आहे. पण इतिहासाला तुडवत पर्यटन असे त्याचे स्वरूप झाले तर एक दिवस पन्हाळा त्याचे मूळ अस्तित्वच हरवून बसणार, हे निश्चित आहे.
विशाळगडची हीच अवस्था आहे. ज्या विशाळगडच्या पायथ्याला शिवरायांच्या शौर्यशाली वाटचालीतील रक्तरंजित इतिहास घडला. बाजीप्रभूंच्यासमवेत शेकडो ज्ञात -अज्ञात मावळ्यांनी आपला देह ठेवला, त्या पन्हाळगडावर जाताना सोबत हातात उलटय़ा कोंबडय़ा घेऊन जाण्याची प्रथा रूढ झाली आहे. तेथेही जरूर काही पवित्र प्रथा सांभाळाव्यात. पण इतिहास विसरून तेथे घडत असणाऱया गोष्टीs वैभवशाली इतिहासाला तडा देऊ लागल्या आहेत.
रांगणा किल्ल्याची बांधणी तर एकमेवाद्वितीय आहे. इतर गड, किल्ले म्हणजे उंचावर चढून जावे लागते. पण रांगणा किल्ला एक चौकट ओलांडून खाली उतरावा लागतो. त्याची खोली कोकणाच्या तिन्ही बाजूला दरीत विसावली आहे. अशा भौगोलिक रचनेचा विचार करून हा किल्ला बांधला आहे. पण त्या अंगाने कधी पर्यटक पाहतच नाहीत. तटाचे दगड खाली दरीत ढकलून त्याचा गडगडत जाणारा आवाज ऐकण्यात काहींना धन्यता आहे. गडावर जाताना खाली पाटगावात दोन-तीन किलो मटण, पत्रावळ्या-द्रोण, दारुच्या बाटल्यासोबत घेण्याची पद्धत काहींनी रुढ केली आहे. अशा वातावरणात रांगणा किल्ल्याची बांधणी, त्याचा इतिहास हे सगळेच बाजूला पडले आहे.
पन्हाळा, विशाळगड व रांगणा ही केवळ तीन उदाहरणे. पण बहुतेक गड-किल्ल्यांची अशीच अवस्था आहे. सात-आठशे वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत हे गड, किल्ले उभे आहेत. काळाच्या ओघात आता ते ढासळत आहेत. किल्ल्यांची डागडुजी करण्यास विलंब झाला आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने काहीच साध्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता सारे पन्हाळकर एकटवले आहेत. पर्यटनही जपायचे आणि इतिहासही जपायचा, हे करताना त्यांची जरूर कसरत होत आहे. पण गडावरचे उघडय़ावर दारू पिणारे, उघडय़ावर दगडाच्या चुली मांडून रस्सामंडळ करणारे, ठेक्यातली गाणी लावून बेधुंद नाचणारे, वाऱयाच्या वेगाने वाहने चालवणारे, उगीचच किंचाळणारे, सकाळ-सकाळी ओढणीने तोंड झाकून ‘शाळकरी’सोबत येणाऱया युगुलांना रोखणे एवढे तरी पोलिसांच्या हातात आहे. पुरातत्त्व खात्याची यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांची विस्ताराने व वेळेत डागडुजी खूप गरजेची आहे. नाही तर गड म्हणजे केवळ दगड धोंडे आणि मौजमजा असेच चित्र दिसणार आहे.
सर्वेक्षणाचे काम सुरु….
पन्हाळगडाच्या भरीव डागडुजीसाठी तातडीने सर्वेक्षण सुरू झाले आहे. मूळ बांधणीशी सुसंगत अशी डागडुजी व्हावी, यासाठी कसबी कारागीरच लागणार आहेत. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत पन्हाळा किल्ला आहे. त्याच्या पुढील कामास लवकरच सुरुवात होईल. विजय चव्हाण
पुरातत्व विभाग पन्हाळा
पर्यटकांनी भान राखावे……
राहिला तरच गड जिवंत राहतील. गडावर पर्यटन जरूर आले पाहिजे. पण गड- किल्ल्यांचे पर्यटन करताना काही निर्बंध आवश्यकच आहेत. ते निर्बंध पाळून पर्यटकांचा वावर ठीक आहे. पण पर्यटकांनीही काही भान राखणे आवश्यक आहे. नाही तर गड किल्ले प्रेमींना त्यांना भानावर आणावे लागेल.
हर्षल सुर्वे
गडकिल्ले संरक्षण कार्यकर्ता