पुणे / प्रतिनिधी :
Hoisting of Kisan Sabha flag on November 15 आदिवासी शेतकऱ्यांचे नेते, क्रांतिकारी, हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी, 15 नोव्हेंबर रोजी किसान सभेच्या वतीने देशभर किसान सभेच्या झेंडय़ांचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या माहितीनुसार, बिरसा मुंडा जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण करीत 15 नोव्हेंबर रोजी देशभर सुमारे एक लाख गावांत किसान सभेच्या झेंडय़ाचे ध्वजारोहण लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 13 ते 16 डिसेंबर 2022 या काळात त्रिचुर, केरळ येथे होत असलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या 35व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रचार कार्याची ही सुरुवात असेल.
बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आणि परकियांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करत राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे व आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारून त्यांना जंगलातून बेदखल केले जात आहे. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करणे अटळ झाले आहे. किसान सभा त्यांचा हा संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही किसान सभेने म्हटले आहे.
अधिक वाचा : साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई