रत्नागिरी प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फूटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसामध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली.जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सुर्यवंशी, रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फूलुन गेले होते.याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र पस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्याखाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र या ठिकाणी दिसून आले.यावेळी पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले.क्रिडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. तिरंगा रॅलीला भरघोस प्रतिसाद याच ठिकाणावरुन दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली निघाली याला जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला व ते स्वत: या रॅलीत सामिल झाले. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले. या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दर, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद,व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले.रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगरपालिका यांचे चित्ररथ देखील होते.