केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषित केली सूची, सर्वसामान्यांना दिलासा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अन्नधान्ये आणि खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्याचा कठोर निर्णय घोषित केल्यानंतर सात दिवसांनी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण जीवनावश्यक वस्तूंच्या सुटय़ा विक्रीवर जीएसटी लावला जाणार नसल्याची दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वस्तूंची सूची घोषित केली आहे.
गेल्या आठवडय़ात जीएसटी कौन्सिलची (वस्तू-सेवा करमंडळ) बैठक झाली होती. त्यात अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटीत 5 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना होती. ही नाराजी लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने दिलासा देण्याचे पाऊल उचलले.
ट्विटर संदेशांची मालिका
खाद्यपदार्थ आणि तत्सम वस्तूंवर जीएसटीत वाढ केल्यासंदर्भात अनेक दिशाभूल करणारे दावे आणि आरोप विरोधी पक्षांनी केले आहेत, असे स्पष्टीकरण सीतारामन यांनी केले आहे. या पदार्थांवर जीएसटी लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. विरोधी पक्ष सत्तेत होता तेव्हाही या पदार्थांना करांच्या जाळय़ात ओढण्यात आले हेते. त्यामुळे विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयाला केवळ राजकीय लाभासाठी विरोध करण्यात येत आहे., असे प्रतिपादन सीतारामन यांनी केले. सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ट्विटर संदेशांची मालिकाच प्रसारित केली आहे.
राज्यांचेही कर होतेच
जीएसटी पूर्व काळात राज्ये अन्नधान्यांवर मोठय़ा प्रमाणात कर लागू करुन करसंकलन करीत होती. त्या तुलनेत केंद्राने लावलेला कर कमी होता. तथापि, त्यासंदर्भातही कोणाचा आक्षेप असल्यास केंद्र सरकार विचार करण्यास तयार होते. विरोधी पक्षांची प्रत्येक मुद्दय़ात राजकारण पाहण्याची सवय घातक आहे. मात्र, केंद्र सरकारने आता अनेक वस्तूंच्या सुटय़ा विक्रीवरील जीएसटी काढून घेतला आहे, असेही प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
केवळ ब्रँडेड वस्तूंवरच...
जीएसटीमंडळाच्या मागच्या बैठकीत केवळ काही ब्रँडेड वस्तूंवरच 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. ब्रँडेड डाळी, आटा आणि धान्ये यांचा या वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर केवळ नोंदणीकृत ब्रँडस्च्या अन्नधान्यांवर जीएसटी लागू करण्यात आला. मात्र या निर्णयावरही काहूर उठविण्यात आले आणि केंद्र सरकारच्या विरोधात गैरसमज पसरविण्यात आले. यापूर्वी देखील राज्ये तांदूळ, गहू, आटा, तूरडाळ व इतर डाळी यांच्यावर 5 टक्के कर वसूल करीत असत. तेच आता केंद्र सरकारने केल्यानंतर त्याला विरोध का केला जात आहे, हे समजणे अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जीएसटीमुक्त वस्तूंची सूची (केवळ सुटय़ा विक्रीसाठी)
1. सर्व प्रकारच्या डाळी (पल्सेस)
2. गहू, ओट, राय, मका, तांदूळ आदी धान्ये
3. आटा किंवा गव्हाचे पीठ
4. सुजी किंवा रवा, बेसन
5. उकडा तांदूळ
6. दही किंवा लस्सी
वरील वस्तू जर पॅकबंद किंवा ब्रँडेड नसतील आणि त्याची सुटी विक्री केली गेली तर त्यांच्यावर जीएसटी द्यावा लागणार नाही. याचाच अर्थ असा की या वस्तू विक्रीपूर्वीही सुटय़ा म्हणजेच अनब्रँडेड किंवा अनपॅकेजड् असल्या पाहिजेत. असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी संदेशांमध्ये दिले आहे.