महाराष्ट्र सरकारने चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे गृहपाठाचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एका शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवी सर्वांना परीक्षेविना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्याचे दुष्परिणाम अद्यापही महाराष्ट्रातील मुले-मुली-पालक भोगत आहेत. त्यामध्ये नवीन भर गृहपाठ रद्द करण्याच्या निर्णयाने घातली आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम काय होतील याचा विचार करण्यापूर्वी गृहपाठ म्हणजे नेमके काय याचा विचार करणे श्रेयस्कर ठरेल.
शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासून जे विषय शिकवले जातात, त्याची उजळणी करण्यासाठी पाठय़पुस्तकांचे वाचन करणे क्रमप्राप्त ठरते. शाळेमध्ये कविता एका ठराविक चालीमध्ये मुला-मुलींकडून म्हणवून घेतल्या जातात पण पुस्तकातील धडे वाचून घेतले जात नाहीत. खरे तर प्रत्येक शाळेने आठवडय़ामधून किमान एक तास वाचन करवून घेण्यासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे. पुस्तकातील अभ्यासक्रम संपवणे हे शिक्षकांचे प्राधान्य असल्यामुळे कदाचित शिक्षकांना शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून असे वाचन करून घेणे शक्य नसेल. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाचनाच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे शिकवलेले धडे विद्यार्थ्यांनी घरी वाचणे अपेक्षित आहे. शिक्षकांनी असे वाचन करण्याचा गृहपाठ दिल्यास विद्यार्थ्यांनी घरी वाचन केले की नाही याची खातरजमा करता येत नाही. त्यामुळे असा गृहपाठ सांगितला जातो ज्याचा पुरावा शिक्षकाना तपासता येईल. त्यामुळे लेखी गृहपाठाचे स्तोम माजले. परंतु वयाच्या सातव्या वर्षापर्यंत बोटांची हाडे निरंतर लिहित राहण्याएवढी मजबूत नसतात. अशा नाजूक हातांना बालवाडी पहिलीमध्येही लिहिण्याचा आग्रह धरला जातो ते गैर आहे. त्यामुळे लिहिण्याचा अभ्यास पहिली दुसरीमध्ये देऊ नये. द्यायचाच झाला तर वर्तुळ काढणे, उभी-आडवी-तिरकी सरळ रेष काढणे, वर्तुळात दोन लहान वर्तुळे डोळ्याच्या स्वरूपात काढणे असे छोटे गृहपाठ देता येतील. परंतु त्याची अंमलबजावणी करताना काही शिक्षक एकच वर्तुळ दहावेळा काढायला सांगू शकतात, ते गैर आहे, मुला-मुलींच्या नाजूक बोटांवर अत्याचार करणारे आहे. याचा अर्थ पहिली-दुसरीला गृहपाठ देणे शिक्षकांनी बंद करावे का? नक्कीच नाही.
पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये वर्गात आणण्यास सांगू शकतात. एका दिवशी विद्यार्थ्यांना पालकांबरोबर भाजी मंडईमध्ये जाऊन निरीक्षण करण्यास सांगू शकतात. विद्यार्थ्यांनी पाच वेगवेगळ्या आकाराची झाडाची पाने वर्गात आणण्याचा गृहपाठ पहिलीसाठी योग्य आहे. प्रत्येकाने घरातून पाच आठ दहा शेंगदाणे मोजून आणावेत आणि वर्गात मोजून दाखवावे हा गृहपाठ असू शकतो. घरातील वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंची नावे सांगणे, पाच प्राणी-पक्षी-झाडे-फुले-फळे-माणसांची नावे-भाज्या-पालेभाज्या बघणे आणि दुसऱया दिवशी घरात काय बघितले याची माहिती देणे असे अनेक गृहपाठ पहिलीसाठी देता येतील. पहिलीपासून चौथीपर्यंतचे गृहपाठ विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने करणे अपेक्षित असते. शाळेमध्ये जे शिक्षण मिळते त्याचा रोजच्या आयुष्यात काय उपयोग होतो, हे विद्यार्थ्यांना पालकांनी वेगळा वेळ काढून शिकवणे गरजेचे आहे. अलीकडे पालक त्यासाठी वेळ न देता क्लासला पाठवतात, हे गैर आहे. जे पालक मुला-मुलींसाठी रोज वेळ देतात, त्यांची मुले बोलतात, प्रश्न विचारतात, नवीन काही शिकण्याची त्यांची इच्छा असते.
दुसरीच्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तक वाचणे, गोष्ट ऐकणे आणि नवी गोष्ट वर्गात सांगणे, भेळ तयार करणे, चपात्याची कणिक तयार करणे, असे अनेक गृहपाठ पाठय़पुस्तकातील धडय़ास अनुसरून देता येतील. राजीव तांबे यांचा पाऊसफुले धडा वाचल्यानंतर पावसात भिजणे-पावसात होणारे बदल अनुभवणे, पालकांसोबत मंडईमध्ये जाणे आणि आपल्या पसंतीची भाजी आणणे, आले-लिंबू-मीठ एकत्र करून खाणे असे गृहपाठ देता येतात. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गोष्टीचे पुस्तक पालकांच्या मदतीने दुकानामधून विकत आणणे हा एक गृहपाठ देता येईल. याबरोबर दुसरीच्या मुलांना शब्द-आकडे त्या अनुषंगिक आकृत्या काढण्याचा गृहपाठ देता येईल. वेगवेगळी चित्रे पालकांच्या मदतीने वाचणे आणि दुसऱया दिवशी (पाठांतर न करता) वर्गात चित्र घेऊन येणे आणि वाचून दाखवणे असे अनेक गृहपाठ तयार करता येतील. चौथीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाच वाद्यांची नावे चित्रावरून सांगणे अपेक्षित आहे, त्याची पुढची पायरी म्हणजे वाद्याचा आवाज ऐकून वाद्य ओळखणे. वृत्तपत्रातील एक बातमी एक चित्र यांचा संग्रह करणे हा गृहपाठ पाठय़पुस्तकामध्ये सांगता येतो. कात्रणे जमवण्याच्या सवयीमुळे वाचनाची त्यांना आवड लागू शकते. वाचनाचा सराव नसलेले अनेक विद्यार्थी आज सहावी-सातवीमध्ये व्यवस्थित वाचू शकत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना चार वाक्ये वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजत नाही, त्यामुळे काय वाचले हे सांगता येत नाही. दोन वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थी/नी शालेय शिक्षणाअभावी चार वर्षे मागे गेले आहेत. त्याबद्दल विचार न करता गृहपाठ बंद केल्यामुळे काय साध्य होणार आहे?
विद्यार्थ्यांचे ओझेच कमी करायचे असेल तर लेखी गृहपाठाबरोबरच कृतीशील गृहपाठ देण्याबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन करता येईल. शिक्षकांच्या हातातली पट्टी काढून घेता येईल. अजूनही अनेक शाळांमध्ये मुले-मुली शिक्षकांचा मार खातात, अनेक शिक्षक आजही नावडत्या विद्यार्थ्यांची जाहीर अवहेलना करतात. अशा शारीरिक-मानसिक हिंसाचाराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची मुक्तता करता येईल. ओझेच कमी करायचे असेल तर शिक्षकांना शालेय शिक्षणाव्यतिरिक्त दिली जाणारी सर्व कामे बंद करता येतील, ज्यायोगे शिक्षक शिक्षणामध्ये अभिनव प्रयोग करण्यावर विचार करू शकतील. एक शिक्षकी शाळांमध्ये प्रत्येक वर्गावर एक याप्रमाणे शिक्षक नेमता येतील. अनेक गावांमध्ये एक शिक्षक एकाचवेळी पहिली-दुसरी-तिसरी असे तीन वर्ग एकाच वेळी चालवत असतो/असते. हे ओझे कमी केल्यास महाराष्ट्रातील गावोगावी शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो. पाठय़पुस्तकातील धडय़ाखालील प्रश्न वाचल्यास बालभारतीने मुलांचा कसा छळवाद केला आहे याची कल्पना येईल. उपासाच्या संकल्पाचा कसा बोजवारा उडाला यावर उपास हा पु.ल. देशपांडे लिखित धमाल विनोदी धडा दहावीच्या मराठीच्या (सेमी इंग्लिश माध्यमाच्या) पुस्तकामध्ये आहे. पाठातील कोणता विनोद तुम्हाला का आवडला याचे स्पष्टीकरण लिहा तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा असे प्रश्न या धडय़ाखाली विचारले आहेत, त्यामुळे मुले या धडय़ाचा आनंद घेऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागणार नाही, असे प्रयत्न केलेले दिसतात. अशा भयंकर प्रश्नांचे गृहपाठाचे ओझे बंद करण्यासाठी पाठय़पुस्तके बदलावीत.
शिक्षण विषयक
धोरण ठरवताना लोकानुनय न करता शिक्षण क्षेत्रात तळागाळात कार्य करण्याचा अनुभव असणाऱया आणि दूरदृष्टी असलेल्या तज्ञांशी सल्ला-मसलत करून निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारे बदलल्यावर शैक्षणिक धोरण बदलणे अपेक्षित नाही. क्रमिक पुस्तकात प्रत्येक धडय़ानंतर दोन कोरी पाने वाढवल्यामुळे 20 वर्षानंतरचा महाराष्ट्र प्रगत होणार आहे का? उद्या नवे सरकार आले आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची पुस्तके रद्द करून टॅब वापरण्याचा आदेश काढला तर त्यामुळे दप्तराचे ओझे आणखी कमी होईल परंतु भोर-वेंगुर्ला-दिंडोरी-धुळे-भुसावळ-गडचिरोली-अकोला अशा तालुक्यातील एक-दोन शिक्षकी शाळांमधील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल? मुला-मुलींची वाचनाची सवय बंद होईल त्यावर उपाय काय? कोणतातरी एक आदेश वरून येतो आणि सर्व शाळा शिकवणे सोडून स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम करण्यात तीन-चार आठवडे घालवतात. अशा कारभारामुळे कोणत्याही सरकारी शाळेला पुढील सहा महिन्याचे शैक्षणिक धोरण आखून त्याची अंमलबजावणी करता येत नाही. याचा परिणामस्वरूप सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत आहे आणि भरभक्कम पैसे घेणाऱया खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतला जात आहे. आर्थिक नाईलाज असणारेच पालक शहरामधील सरकारी शाळेत आपल्या पाल्यांना शिकवण्यासाठी पाठवतात. तालुके-छोटय़ा गावात पर्याय नसल्यामुळे सरकारी शाळांत प्रवेश घेतला जातो. त्यामुळे शैक्षणिक धोरण ठरवताना शिक्षणामधील प्रश्नांची-वस्तुस्थितीची जाणीव ठेवून, भविष्यात येऊ घातलेल्या बदलास सक्षमपणे तोंड देणारी पुढील पिढी घडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुढील दहा वर्षात सरकारी शाळा बंद करण्याच्या दृष्टीने उचलली जाणाऱया अशा पावलांचे ठसे दीर्घकाळ मागे राहतील आणि आठवीपर्यंत कोणतीही परीक्षा न देणारे आणि चौथीपर्यंत गृहपाठ न करणारे विद्यार्थी भारतामध्ये बौद्धिकदृष्टय़ा सर्वात मागास राहतील, यात शंका नाही.
सुहास किर्लोस्कर