प्रियांका गांधी यांची खानापुरात घोषणा : काँग्रेस सत्तेवर आल्यास सात गॅरंटी
खानापूर : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील अडीच लाख बेरोजगारांना रोजगार देणार, अंगणवाडी सेविकांना 15 हजार, साहाय्यकला 10 हजार तर आशा वर्करना 8 हजार ऊपये, मध्यान्ह आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना 5 हजार वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी खानापुरातील काँग्रेसचे उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचार सभेत केली. प्रियांका गांधी यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटक राज्यातील जनतेला पाच भरोसे (गॅरंटी) दिल्याचे सांगून यात अन्नभाग्याच्या माध्यमातून तांदूळ, ज्योतीभाग्यच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत, राज्यातील स्त्रियांना व विद्यार्थ्यांना बस प्रवास पूर्णपणे मोफत केला जाईल. तसेच राज्यातील अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीनंतर 3 लाख रुपये तसेच आशा कार्यकर्त्यांना सेवानिवृत्तीनंतर 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. यामुळे आता काँग्रेसकडून सात गॅरंटी देण्यात येत आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वसामान्य जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी निश्चित प्रामाणिक प्रयत्न पेले जातील, असे ठोस आश्वासन प्रियांका गांधी यांनी दिले.
भाजपवर टीका
त्या पुढे म्हणाल्या, कर्नाटकात वनसंपत्ती, खनिज, निसर्ग आणि ज्ञानगंगा तसेच वैचारिकतेचे भंडार भरलेले आहे. त्यामुळ कर्नाटक समृद्ध आहे आणि तो समृद्ध राहिलाच पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या हातात कर्नाटक असणे ही काळाची गरज आहे. कर्नाटक हे देशात अग्रेसर राज्य आहे. मात्र चुकीच्या राज्यकर्त्यांच्या हातात राज्य आहे. त्यांना राज्य कसे चालवायचे हे माहीत नाही. सामान्य जनतेची लूट करून 40 टक्के कमिशनवर हे सरकार चाललेले आहे. हे सरकार सत्तेच्या धुंदीत आहे. सत्तेच्या माजात सामान्य जनतेची त्यांना फिकीर नाही. सामान्य जनतेची लूट केलेली आहे. सत्तेच्या जोरावर ऐषोआराम करण्याचे उद्दिष्ट आहे. हे सरकार नैतिकता धाब्यावर बसवून सत्तेत आलेले आहे. त्यामुळे या सरकारची नियतच वाईट आहे. या सरकारमुळे कर्नाटक राज्याचा विकास खुंटला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, अशी टीकाही भाजप सरकारवर केली.
कर्नाटकात दीड लाख कोटींची लूट
राज्यात अडीच लाख नोकरीच्या संधी असताना या सरकारने जाणीवपूर्वक साडेतीन वर्षांत या जागा भरलेल्या नाहीत. उच्चशिक्षित लोक आज बेरोजगार म्हणून जगत आहेत. नोटाबंदी, जीएसटी यांच्यामुळे व्यापारी वर्गही आज मेटाकुटीला आलेला आहे. हे सरकार नितीभ्रष्ट तर आहेच तसेच संवेदनहिन आहे. या सरकारने लहान मुलांच्या तोंडातील घासही काढून घेतलेला आहे. मुलांना देण्यात येणाऱ्या अंड्यातही भ्रष्टाचार केलेला आहे. ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे मोदी मात्र मौन पाळत आहेत. जर पुन्हा राज्यात भाजप सत्तेवर आल्यास तुमचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. राज्यात नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात लाच घेतली जाते. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. भाजप सरकारने कर्नाटकच्या दीड लाख कोटींची लूट केलेली आहे. या दीड लाख कोटी लाखात कर्नाटकचा कायापालट झाला असता. देशात आरक्षणास वाढ देणे गरजेचे होते. याबाबतचा अहवालही सरकारला देण्यात आला होता. मात्र मोदींनी स्वत: पार्लमेंटमध्ये या आरक्षणाला विरोध करत नाकारून लावले आहे.
माझ्यासाठी मोठा भाग्याचा दिवस : अंजली निंबाळकर
सुऊवातीला आमदार अंजली निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रियांका गांधी यांचा सत्कार केला. यावेळी निंबाळकर म्हणाल्या, खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या गांधी घराण्यातील प्रतिनिधी प्रथमच खानापुरात आलेल्या आहेत. यामुळे आजचा दिवस खानापूरसाठी आणि माझ्यासाठी मोठा भाग्याचा आहे. काँग्रेसने काय केले. हे भाजपवाले विचारत आहेत. देशाची उभारणी काँग्रेसने केलेली आहे. माझ्या प्रतिनिधीत्वामुळे तालुक्यात विकासाची गंगा पोहोचलेली आहे. यात आरोग्य सेवा, जलसिंचन सेवा, रस्ते, शिक्षण, कृषी विभागात विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भविष्यात खानापूरचा कायापालट करण्याचा माझा संकल्प आहे. तरी मतदार मायबापांनी मला पुन्हा एकदा निवडून देण्याची आपल्याकडे विनंती करत आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले, कर्नाटक राज्याच्या विकासासाठी काँग्रेसला निवडून द्यावे, तसेच बेळगाव जिल्ह्याचा विकास साधायचा असल्यास काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. कर्नाटकचे प्रभारी रणजीत सुरजेवाला, एआयसीसीचे सेक्रेटरी विष्णूदास, सतीश जारकीहोळी, एआयसीसीचे सेक्रेटरी अर्शद, जिल्हा प्रभारी मनिकंठ, निजामुद्दीन काजी, अध्यक्ष महादेव कोळी, रियाजअहमद पटेल, लक्ष्मी मादार यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
ठळक मुद्दे
- तालुक्यातील दिव्यांग कलाकार पुंडलिक कुंभार यांच्या हस्ते प्रियांका गांधींना बुद्धाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
- हेलीपॅड ते सभा स्थळापर्यंत प्रियांका गांधी यांच्या वाहनांचे सारथ्य आमदार अंजली निंबाळकर यांनी केले.
- महिलांची लक्षणीय उपस्थिती
- सकाळी 10 वाजल्यापासूनच सभा स्थळावर गर्दी
- 12.45 ला प्रियांका गांधी यांचे आगमन
- संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.