सावईवेरे ग्रामिण वाचनालयातर्फे आयोजन : पद्मश्री विनायक खेडेकर, संजीव वेरेकर व उदय म्हांब्रे
मोहन वेरेकर /सावईवेरे
अंत्रुज महाल हा संगीत नाटय़, साहित्य इत्यादी सर्वच क्षेत्रात अंत्यत नावाजलेला आहे. कै. मास्टर दत्ताराम वळवईकर, गानतपस्वीनी सुरश्री केसरबाई केरकर, कै. मलबाराव सरदेसाई, कै. व्यंकटेश पै रायकर तसेच पुंडलीक नायक अशा विविध क्षेत्रात दैदित्यमान काम केलेल्या व्यक्ती याच अंत्रुज महालातील होय.
याशिवाय विनायक खेडेकर, संजीव वेरेकर व उदय भेब्रे यांनी साहित्य क्षेत्रात भरीव काम केल्याने त्यांना विविध संस्थाचे साहित्यिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी यापुढेही दर्जेदार साहित्य निर्मिती करावी त्यासाठी उर्जा व प्रोत्साहन मिळावे यासाठी सावईवेरे ग्रामिण वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार 23 रोजी त्यांच्या सावईवेरे नागरिकांतर्फे ग्रामिण वाचनालयाच्या पुढाकाराने सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
आज सायंकाळी 4.30 वा. सावईवेरे बाजारातून वाद्यांच्या तालावर त्यांना ग्रामिण वाचनालयाच्या सभामंडपात आणण्यात येईल. ग्रामिण वाचनालयाच्या इमारतीचे हल्लीच नुतनीकरण झाल्याने त्याच्याहस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर वाचनालयात तीन ठिकाणी त्याच्या पुस्तकाचे प्रदर्शन होईल व त्याचे उद्घाटन समई प्रज्ज्वलनाने होईल. त्यानंतर सत्कार सोहळय़ाला प्रारंभ होईल. प्रमुख वक्ते म्हणून मुकेश थळी उपस्थित असतील. तर खास निमंत्रित म्हणून सरपंच सत्यवान शिलकर तसेच अध्यक्षस्थानी डॉ. दत्ताराम देसाई भूषवतील.
पद्मश्री विनायक खेडेकर
विनायक खेडेकर यांचा जन्म सावईवेरे गावात झाला. गोवा मुक्ती पुर्वकाळात शिक्षणाची सोय नव्हती. लहानपणी त्याना मराठी माध्यमातून तिसरीपर्यंतचे शिक्षण घेता आले. कुळागारात काम करणे, परिसरातील भागात पौरोहित्य करणे हेच उपजिवीकेचे त्यांच्या कुटूंबाचे साधन होते. गुरूकुल पद्धतीने त्यांनी संस्कृत, र्वैदिकी ज्योतिष, यद्दिकी इत्यादीचे अध्ययन केले. स्वकतृत्वाने त्य़ांनी मराठी, कोकणी, इंग्रजी, संस्कृत व पोर्तुगीज या भाषावर प्रभूत्व मिळवले. पुढे दैनिक केसरीचे ते गोवा प्रतिनिधी बनून पत्रकारितेत त्यांनी प्रवेश केला. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटय़क्षेत्र यात महत्वाचे काम केल्याने कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात गोवा कला अकादमी सदस्य सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. गोव्यातील शिमगो, धालो, देखणी, जागर, दशावतारी, काला इत्यादी लोककला प्रकाराचे लिखाण केले. गोमंतकीय लोककला, लोकसंस्कृती केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, रशिया यासारख्या देशात पसरविण्याचे काम केले. लोककलेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट संघटक, उत्कृष्ट प्रशासक व उत्कृष्ट संशोधक म्हणून ते प्रसिद्धिस पोहोचले. त्यांनी गोव्यातील एक सिद्धहस्त साहित्यिक म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे. त्यांनी अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती केली असून मराठी, इंग्रजी, कोकणी या भाषात एकूण 18 पुस्तकांचे लिखाण केले आहे.
त्यांना आतापर्यंत गोवा शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, महाकवी कालिदास पुरस्कार, रंग सन्मान पुरस्कार, कृष्णदास शामा पुरस्कार, डॉ. कोमल कोठारी पुरस्कार तसेच गेल्यावर्षी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य क्षेत्रातील त्याच्या कार्यामुळे त्याचा नागरी सत्कार केला जात आहे. सावईवेरे गावचे दुसरे सत्कारमुर्ती संजीव वेरेकर हे आहेत.
श्री संजीव वेरेकर
संजीव वेरेकर लहानपणापासून अंत्यत धडपडी व्यक्ती आहे. सुप्रसिद्ध कवी, लेखक तसेच ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्याचा जन्म सावईवेरे गावात 28 ऑगस्ट 1959 साली झाला. सावईवेरे गावात मराठी चौथीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर बी. ए पर्यंतचे शिक्षण घरीची परिस्थिती गरीबीची असूनही पुर्ण केले. त्यांनी लहानपणापासून कोकणी भाषेत लिखाण सुरू केले. त्यांनी भावझुंबर, मुंबर,गावातली सांज, पडवेवयली संवणी, चैतन्याचे पावळय़ो, अस्वस्थ सुर्य, सांज सुलुस, रक्तचंदन हे कवितासंग्रह व तीपय, मांड ओसाड जातना, हाडामासांची देवळां, चौथो खामो कोस्मेतना, दाभाळ ते दिल्ली विनय तेंडूलकर, कोकणी राजभाषा कशी जाली? प्रेरणा रूख इत्यादी पुस्तकाबरोबरच अनुवादीत साहित्यही त्यांनी लिहिले. त्याच्या साहित्याचा समावेश अभ्यासक्रमातही आहे. त्यांना आतापर्यंत विमला वी. पै. कविता कृती पुरस्कार, डॉ. टीएम ए पै. अवॉर्ड, आकाशवाणी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हल्लीच त्यांना नवी दिल्लीच्या केंद्रीय साहित्य अकादमी संस्थेने साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे.साहित्य क्षेत्रातील त्याच्या कार्यामुळेच त्याचा आज नागरी सत्कार केला जात आहे.
श्री उदय म्हांब्रे
उदय म्हांब्रे यांचा जन्म सावईवेरे गावाला लागून असलेल्या वळवई गावात झाला. लहानपणपासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. गेली 43 वर्षे ते कथा, कविता, निबंध यांचे लिखाण करीत आहे. व्यवसायाने नारळाचे व्यापारी असले तरी फिरतीवर असताना जे जे दिसते ते ते कथा कवितातून ते व्यक्त करत आले आहेत. त्यांनी हय सायबा, मनशाच्या सोदांत, नविश्री क्रिएशन्स, इंद्रधोणू उदेव, कळीज उसवलां आदी त्याची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते राष्ट्रमत, सुनापरांत, भांगरभूय, हेराल्ड सारख्या दैनिकात तसेच बिंब, ऋतू, जाग, कोकणी टाईम्स, अपुर्व चित्रंगी यात लिखाण करीत असतात. उत्तर अमेरीकेत झालेल्या गोवा परिषदेत प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी अनेक कवी संमेलनात सहभाग घेतला आहे. श्री सरस्वती मंदिर, कोकणी भाषा मंडळ, गोमंत कला असोसिएशन संस्था यांची बक्षिसे त्यांना प्राप्त झाली आहेत. 2021 मध्ये त्यांना इंद्रधोणू उदेव या कविता संग्रहास विश्व कोकणी केंद्राचा 2021 वर्षाचा श्रीमती विमला वी. पै कविता कृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा या तिन्ही साहित्यिकांचा सन्मान पुढील आदर्श ठरो यासाठीच करण्यात येत आहे.