विधान परिषद निवडणूक : अरुण शहापूर यांची हॅट्ट्रिक हुकली : रात्री उशिरापर्यंत मतमोजणी : कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रतिनिधी /बेळगाव
येथील ज्योती महाविद्यालयामध्ये बुधवारी सकाळी 8 पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. पश्चिम शिक्षक मतदारसंघाचा प्रथम निकाल जाहीर झाला. यामध्ये बसवराज होरट्टी हे 9 हजार 266 मते घेऊन विजयी झाले तर वायव्य शिक्षक मतदारसंघामधून काँग्रेसचे प्रकाश बाबण्णा हुक्केरी हे 11 हजार 460 मते घेऊन विजयी झाले. वायव्य पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामध्ये सुरुवातीपासूनच हणमंत निराणी यांनी आघाडी घेतली होती.
वायव्य शिक्षक मतदारसंघाची निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली होती. बुधवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच प्रकाश हुक्केरी यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत प्रकाश हुक्केरी यांना 4 हजार 827 तर अरुण शहापूर यांना 3 हजार 135 मते मिळाली. तर दुसऱया फेरीमध्ये प्रकाश हुक्केरी यांना 5 हजार 694 तर अरुण शहापूर यांना 2 हजार 916 मते मिळाली. तिसऱया फेरीमध्ये प्रकाश हुक्केरी यांना 939 तर अरुण शहापूर यांना 354 मते मिळाली.
वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 21 हजार 402 मतदान झाले होते. त्यामध्ये तब्बल 1 हजार 270 मते बाद ठरली तर एकूण 20 हजार 132 मतदान ग्राहय़ धरण्यात आले. त्यामध्ये प्रकाश हुक्केरी यांना 11 हजार 460 तर अरुण शहापूर यांना 6 हजार 405 मतदान झाले. त्या खालोखाल बन्नूर एन. बी.
यांना 1 हजार 9, चंद्रशेखर लोणी यांना 544, श्रीनिवासगौड गौडर यांना 554, चंद्रशेखर गुडासी यांना 101, बसाप्पा मणिगार 39, श्रीकांत एम. पाटील 19, जयपाल आर. देसाई 10, आप्पासाहेब कुरणे 9, श्रीनिक ए. जनगटे 8 चिकनगुंड संगमेश यांना 4 मते मिळाली आहेत.
पहिल्यापासूनच प्रकाश हुक्केरी यांनी आघाडी घेतली होती. दुसऱया फेरीनंतर प्रकाश हुक्केरी यांचा विजय स्पष्ट झाला. त्यामुळे अरुण शहापूर यांनी मतदान केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले. त्यांनी हा आपला वैयक्तिक पराभव असून भाजपच्या सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पैशांसमोर आपले काहीही चालले नाही, अशी खंत त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
सोमवार दि. 13 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 12 जण रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
ज्योती कॉलेज परिसरात कडेकोट बंदोबस्त
मतमोजणी असल्यामुळे क्लब रोडवरील ज्योती कॉलेज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. क्लब रोडवर बॅरिकेड्स लावून केवळ पासधारकांनाच आत प्रवेश दिला जात होता. त्यानंतर ज्योती कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरही सर्वांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता.
अन् जिल्हाधिकारी भडकले….
पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी हणमंत निराणी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ज्योती कॉलेजमध्ये प्रवेश केला. यावेळी स्ट्राँग रुममध्ये त्यांचा कार्यकर्ता येण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्याला अडविले. त्यानंतर त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. तुझ्याकडे पास आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्या कार्यकर्त्याकडे पासच नव्हता. त्यामुळे तू आत कसा आलास? असे म्हणून त्याला चांगलेच खडसावले. यावेळी तो कार्यकर्ता थातूरमातूर उत्तरे देत होता. त्यामुळे त्याला प्रथम बाहेर काढा म्हणून पोलिसांना सुनावले. यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. पोलिसांनी त्याला बाहेरची वाट दाखविली.
शिक्षकांचीच 1270 मते ठरली अवैध!
कोणतीही निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या कामकाजासाठी शिक्षकांना जुंपले जाते. प्रत्येक मतदान प्रक्रियेमध्ये शिक्षकांना सामावून घेतले जाते. सर्वच निवडणुकांवेळी मतदान प्रक्रियेबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र या निवडणुकीत शिक्षकांचीच 1270 मते बाद ठरली असून हा एक चर्चेचा विषय बनला आहे. 21 हजार 402 मतदारांपैकी तब्बल 1270 शिक्षकांची मते बाद ठरली आहेत.
वायव्य पदवीधर मतदारसंघातून भाजपचे हणमंत निराणी विजयी
तब्बल 44 हजार 815 मते घेऊन विजय संपादन
वायव्य पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हणमंत निराणी यांनी मोठा विजय मिळविला. तब्बल 44 हजार 815 मते घेऊन त्यांनी काँग्रेसच्या सुनील संक यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बुधवारी रात्री 12.15 वाजता ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
भाजपचे उमेदवार हणमंत निराणी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळविली. एकूण 7 फेऱया झाल्या. त्यामध्ये त्यांनी सर्वच फेऱयांमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीमध्ये 6 हजार 727 मते मिळविली. दुसऱया फेरीत 6 हजार 832, तिसऱया फेरीत 6 हजार 47, चौथ्या फेरीत 6 हजार 974, पाचव्या फेरीत 6 हजार 915, सहाव्या फेरीत 6 हजार 115 आणि सातव्या फेरीमध्ये 3 हजार 802 मते घेतली. एकूण सात फेरींमध्ये 44 हजार 815 मते मिळवून विजय संपादन केला.
वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 65 हजार 922 मतदान झाले. यामध्ये एकूण 56 हजार 916 मते वैध झाली तर तब्बल 9 हजार 6 मते अवैध ठरविण्यात आली. काँग्रेसचे उमेदवार सुनील संक यांना 10 हजार 122 मतांवर समाधान मानावे लागले. याचबरोबर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे जे. सी. पटेल 194, यल्लाप्पा कलकुत्री 221, आदर्शकुमार पुजारी 370, घाटीगेप्पा मगदूम 68, दीपक एस. 453, निंगाप्पा बजंत्री 167, भीमसेन बागी 168, आर. आर. पाटील 172, सुभाष कोटेकल यांना 166 मते मिळाली आहेत.
हे. त्यांनी पहिल्यापासून शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी मिळविली. त्यांचा विजय हा निश्चित होता. मात्र उशिरापर्यंत मतमोजणी झाली. रात्री 12.15 वाजता शेवटची फेरी झाल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
पदवीदारांकडूनही अवैध मतदानाचा विक्रम
शिक्षण क्षेत्रामध्ये पदवी घेतली मात्र मतदान करण्याचा अनुभव त्यांना कमी असल्याचे दिसून आले. कारण तब्बल 9 हजार 6 मतांना बाद ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा एक वेगळाच विक्रम झाला आहे. एकूण 65 हजार 922 मतदानामध्ये तब्बल 9 हजार 6 मते अवैध ठरल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.
पश्चिम शिक्षक मतदारसंघातून बसवराज होरट्टी विजयी
पश्चिम शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीही ज्योती कॉलेजमध्ये पार पडली. पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या बसवराज होरट्टी यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी दुसऱया फेरीमध्ये विजय संपादन केला असून एकूण 9 हजार 266 मते घेतली आहेत. तर काँग्रेसचे बसवराज गुरीकर यांना 4 हजार 597 मतांवर समाधान मानावे लागले. बसवराज होरट्टी विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
यापूर्वी बसवराज होरट्टी यांनी निधर्मी जनता दलातून निवडणूक लढविली होती. त्यांनी त्यावेळीदेखील विजय संपादन केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली आणि विजय संपादन केला आहे. ते आठव्यांदा विजयी झाले आहेत. पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 15 हजार 583 मतदान झाले होते. त्यामध्ये 14 हजार 380 मते वैध ठरली, तर 1223 मते बाद ठरली आहेत.
बसवराज होरट्टी यांनी 9 हजार 266, काँग्रेसचे बसवराज गुरीकर यांना 4 हजार 597, श्रीशैल गडादिन्नी यांना 273, एम. बी. करबसाप्पा यांना 60, कृष्णवेणी यांना 58, एफ. व्ही. कल्याण्णा गौडर यांना 27, गोविंदगौडर रंगंनगौडा 79 मते पडली आहेत. बसवराज होरट्टी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 4 हजार 669 मतांनी विजय संपादन केला आहे.
पश्चिम शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीही सकाळी 9 च्या दरम्यान सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच बसवराज होरट्टी यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. दुसऱया फेरीत ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.