प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष टाळण्यासाठी उचलले जाणार पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुठल्याही प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी आणि सीमेवर दोन्ही देशांमधील मुद्दय़ांवर खुली आणि थेट चर्चा करण्यासाठी भारत आणि चीन महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. दोन्ही देश स्वतःच्या वायुदलांदरम्यान एक हॉटलाइन प्रस्थापित करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मागील आठवडय़ात चुशूल मोल्डो येथे बैठक पार पडली होती. यात चिनी आणि भारतीय वायुदलादरम्यान थेट हॉटलाइन स्थापित करण्याच्या मुद्दय़ावरही चर्चा झाली होती. हॉटलाइनचे स्वरुप आणि स्तर दोन्ही देशांदरम्यान सैन्य स्तरावर होणाऱया पुढील बैठकांमध्ये ठरण्याची शक्यता आहे. लढाऊ विमानांशी निगडित मुद्दे अत्यंत वेगाने एका मोठय़ा संघर्षाचे कारण ठरू शकत असल्याने दोन्ही देशांच्या वायुदलांदरम्यान हॉटलाइन असणे अत्यंत आवश्यक आहे.
पूर्व लडाख सेक्टरमध्ये अलिकडेच चिनी वायुदलाच्या हालचाली पाहता हॉटलाइनवर चर्चा आवश्यक ठरली आहे. चिनी लढाऊ विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक येण्याचे प्रकार घडले आहेत. चुशूल मोल्डोमध्ये झालेल्या सैन्यस्तरीय चर्चेत भारताने चीनच्या वायुदलाकडून हवाईसीमेचे करण्यात आलेल्या उल्लंघनाबद्दल तीव्र हरकत नोंदविली होती. भारतीय वायुदलाने चीनच्या लढाऊ विमानांना पिटाळून लावले होते. हवाई क्षेत्राच्या उल्लंघनासारखी चिथावणीपूर्ण कृती टाळा, असे भारताने चीनला बजावले होते.
विशेष सैन्य चर्चेत दोन्ही देशांच्या वायुदलाच्या अधिकाऱयांनी भाग घेतला होता. याचबरोबर सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. भारताच्या शिष्टमंडळात एअर कमोडोर अमित शर्मा सहभागी होते. तर चीनकडून याच स्तराचा एक अधिकारी सामील झाला होता.
तिबेटमधील विमानांचा सुगावा लावण्याच्या भारतीय वायुदलाच्या क्षमतेवर चीनने बैठकीत आक्षेप नोंदविला होता. चीन सातत्याने याप्रकरणी तक्रार करत आहे. भारत आणि चीन यांच्या वायुदलातील चढाओढ जून महिन्यात सुरू झाली होती. 25 जून रोजी चिनी वायुदलाच्या एक जे-11 लढाऊ विमानाने तणावपूर्ण क्षेत्राच्या अत्यंत जवळून उड्डाण केले होते. भारतीय वायुदलाच्या रडारने या चिनी विमानाचा सुगावा लागत सैन्याला सतर्क केले होते.
मिराज अन् मिगद्वारे प्रत्युत्तर
चिनी वायुदलाकडून हवाईक्षेत्राच्या उल्लंघनाची कृती एक महिन्यापेक्षा अधि काळापर्यंत सुरू होती. यादरम्यान भारतीय वायुदलाने मिराज 2000 आणि मिग-29 सह अन्य लढाऊ विमानांद्वारे चीनला प्रत्युत्तर दिले होते. चीनला भारतीय वायुदलाच्या या आक्रमक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. चिनी वायुदलाच्या कुठल्याही दुस्साहसाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुदल सज्ज होते.