वार्ताहर /हिंडलगा
संततधार पावसामुळे भिंतीत पाणी पाझरल्याने मण्णूर येथील मारुती गल्लीतील यल्लाप्पा फकिरा नाईक यांचे घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. घरी कोणीही नसल्याने सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यल्लाप्पा नाईक यांचे मातीचे बांधकाम असलेले घर होते. गेल्या आठ दिवसांपासून झालेल्या पावसामुळे घराच्या भिंतीमध्ये पाणी पाझरल्याने त्या कमकुवत बनल्या होत्या. त्यामुळे घराच्या छतासह मागील बाजूच्या भिंती कोसळल्याने नाईक यांचे सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आतील संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने नाईक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत माहिती मिळताच तलाठी कापसे यांनी पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविला आहे. शासनामार्फत नुकसानभरपाई मिळावी, अशी यल्लाप्पा नाईक यांची अपेक्षा आहे.