नुकसानग्रस्तांना सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे आहार किटचे वितरण
वार्ताहर /अगसगे
केदनूर-मण्णीकेरी येथे धुवाधार झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली आहे. यामुळे गरिबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना आमदार सतीश जारकीहोळी फौंडेशनमार्फत आहारधान्याचे किट वितरण करून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
सध्या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसाने राज्यामध्ये हाहाकार माजविला आहे. परिणामी अनेक घरांची पडझड झाली आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शेती पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरीवर्ग घर आणि शेतातील पिके गमावल्याने हवालदिल झाला आहे. यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. शासनाकडून मात्र अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. घरे कोसळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आमदार सतीश जारकीहोळी यांना मिळताच नुकसानग्रस्तांना सतीश जारकीहोळी फौंडेशनतर्फे आहार धान्याचे किट वितरण करण्यात येत आहे.
केदनूर येथील प्रकाश रामचंद्र सुतार, शांता यल्लाप्पा वर्गे, रेखा बाळू राजाई, मल्लव्वा मल्लप्पा पाटील, प्रभू देवणू राजाई आणि मण्णीकेरी येथील कल्पना शटू पाटील यांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्वांना आमदारांचे स्वीय साहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी घरांची पाहणी करून आहारधान्यांचे किट वितरण केले. शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य परशराम गुडगेनट्टी, गावडू बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते सिद्राय बुक्याळ, रामा वर्गे, मारुती अजाणी, शांताराम काकतकर, यल्लाप्पा राजाई, राजू मायाना आदी उपस्थित होते.