स्वच्छता निरीक्षकांकरवी ध्वजांचे वितरण : महापालिका कार्यालयात 38 हजार ध्वज दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य उत्सवानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने आता घरोघरी तिरंगा देण्याची मोहीम बुधवारपासून हाती घेण्यात आली आहे. कन्नड व सांस्कृतिक खात्यामार्फत महापालिकेला तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले असून, हे ध्वज घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी महसूल निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केंद्र शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता तिरंगा ध्वजांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. याकरिता सरकारी यंत्रणेसह खासगीरित्याही ध्वज निर्मिती सुरू आहे. पोस्ट कार्यालय आणि विविध संघटनांमार्फत तिरंगा ध्वज उपलब्ध करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्यावतीने कन्नड आणि सांस्कृतिक खात्यामार्फत तिरंगा ध्वज घरोघरी पोहोचविण्यासाठी महापालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी महापालिका कार्यालयात 38 हजार ध्वज दाखल झाले आहेत. एकूण 70 हजार ध्वज उपलब्ध करण्यात येणार असून शहरातील नागरिकांना तसेच महापालिका व्याप्तीमधील शाळा आणि सरकारी कार्यालयांना ध्वज वितरित करण्याची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे.
घरोघरी तिरंगा पोहोचविण्याची जबाबदारी महापालिकेच्यावतीने महसूल निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील विविध मॉल, व्यावसायिक अस्थापने आणि घरोघरी तिरंगा विक्री करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक ध्वजासाठी 22 रुपयांची आकारणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱयांवर विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामध्ये आता ध्वज वितरणाच्या जबाबदारीची भर पडली आहे.
‘हर घर तिरंगा’मोहिमेसंदर्भात नवीन अधिसूचना
हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत प्रत्येक घरावर आणि संस्थांवर तीन दिवस तिरंगा ध्वज फडकविला जाणार आहे. नवीन आदेशानुसार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ध्वज फडकविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये व इतर स्थानिक संस्थांवरील ध्वज दिवस मावळताना खाली उतरविणे आवश्यक आहे. याप्रकारे पुन्हा दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजता ध्वज फडकवायचा आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिवस मावळताना ध्वज उतरवायचा आहे. घरावरील ध्वज मात्र सलग तीन दिवस फडकवत ठेवण्याचा आदेश सरकारने बजावला आहे.
यापूर्वीच्या आदेशामध्ये शाळा, महाविद्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि घरांवर सलग तीन दिवस ध्वज फडकविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशामध्ये बदल करण्यात आला असून शाळा, महाविद्यालये आणि संस्थांवरील ध्वज दिवस मावळताना उतरवावे लागणार आहेत.