एटीएसबरोबरच गुप्तचर यंत्रणेसमोर आव्हान
प्रतिनिधी/ डिचोली
डिचोली, सांखळी, वाळपई परिसरात अटक करण्यात आलेले आणि देशभरात असलेले बांगलादेशी घुसखोर भारतात घुसल्यानंतर प्रथम पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य करतात आणि नंतर दिल्ली किंवा बंगळुरु येथे आपले भारतीय आधारकार्ड बनवतात. आधारकार्डच्या आधारे ते देशभर भ्रमंती करतात आणि बेमालूमपणे वास्तव्य करतात, असे तपासात आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बोर्डे डिचोली येथील एका व्यक्तीच्या जागेत वास्तव्य करणारे तसेच भंगार गोळा करण्याचे काम करणाऱया चार बांगलादेशी घुसखोरांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एक बिलाल अन्वर आखोन हा वाळपई येथे वास्तव्यास असून तोही भंगार गोळा करण्याचाच व्यवसाय करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पोलीस पथकाला मिळताच त्यालाही पथकाने काल बुधवारी ताब्यात घेतले आहे.
देशद्रोही एजंट, दलालांचा शोध घेणे आवश्यक
या बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणण्यात गुंतलेल्या देशद्रोही एजंटांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यांना बेकायदेशीरपणे भारतीय आधारकार्ड कुठून व कोणाकडून करून मिळते याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. सध्या गोव्यात आढळून येत असलेल्या बांगलादेशींनाही गोव्यात आणून येथे स्थायिक करण्यास कोणीतरी दलाल असणारच त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. सध्या ताब्यात व नजरकैदेत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची कसून चौकशी केल्यास बऱयाच काही गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यादृष्टीने राज्य सरकारने पाऊल उचलणे नागरिकांच्या हितार्थ बनले आहे.
घुसखोरांना सहकार्य करणाऱयांचीही चौकशी व्हावी
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात एटीएम फोडी, बँक चोरीप्रकरणात बांगलादेशी गुंतल्याचे समोर आले होते. या बांगलादेशींना नंतर अप्रत्यक्षपणे न्यायालयात मदत तसेच सहकार्य करणाऱया घटकांची चौकशी केल्यास बरीच माहिती बाहेर पडू शकते. वाळपई येथे आढळलेल्या बिलाल अन्वर आखोन याच्याकडून दहशतवाद विरोधी पथकाला बरीच माहिती मिळू शकते. त्या अनुषंगाने पोलिसांना चौकशी करावी लागेल, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.