तीन दिवसांत दोघा जणांचा बळी : अवजड वाहतूक बंदीची वेळ वाढविणार, अपघातामुळे अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अवजड वाहनांना शहरात ठराविक काळापुरती बंदी असूनही अवजड वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसांत दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला असून त्यामुळे अवजड वाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा ठळक चर्चेत आला आहे. प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कॅम्प येथे लोखंडवाहू ट्रकच्या ठोकरीने अरहान बेपारी (वय 10) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. त्याच्या बहिणीसह दोघे जण जखमी झाले. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.20 वाजता जुन्या भाजीमार्केटजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने सादीया पाळेगार (वय 16, मूळची रा. कुडची. सध्या रा. अशोकनगर) ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली होती. या अपघातात तिची मामी जखमी झाली होती.
अवजड वाहनांमुळे तीन दिवसांत घडलेल्या दोन अपघांतात दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळच्या अपघातानंतर संतप्त जमावाने अवजड वाहनांच्या वाहतुकीविषयी आपल्या मनातील खदखद पोलीस अधिकाऱयांसमोर बोलून दाखविली. प्रत्येक बैठकीत आम्ही वाहतूक समस्येविषयी अधिकाऱयांचे लक्ष वेधतो. त्या समस्या मात्र सोडविल्या जात नाहीत. त्या अशाच राहतात, असा आरोप नागरिकांनी केला.
खानापूर रोडवर यापूर्वी ट्रक, टिप्पर व परिवहन बसच्या ठोकरीने अनेक विद्यार्थ्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. वाढती मागणी लक्षात घेऊन 2018 मध्ये सकाळी 9 ते 12 यावेळेत पोलीस दलाने अवजड वाहनांची वाहतूक शहरातून बंद केली होती.
सकाळी 8 पासून अवजड वाहतूक बंद करण्यासंबंधी प्रस्ताव
यासंबंधी वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांच्याशी संपर्क साधला असता सध्या सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत अवजड वाहने शहरात सोडली जात नाहीत. शहराबाहेर बॅरिकेड्स उभे करून ही वाहतूक अन्य मार्गाने वळविली जात आहे. बुधवारी जी घटना घडली सकाळी 8.30 वाजता घडली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांची वेळ लक्षात घेऊन आता सकाळी 8 पासून अवजड वाहतूक बंद करण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवजड वाहतूक बंदी काटेकोरपणे होत नाही
बुधवारचा अपघात 8.30 वाजता घडला आहे. सोमवार दि. 1 रोजी झालेला अपघात सकाळी 7.20 वाजता झाला. त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे शहरात अवजड वाहतूक बंद आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चार वर्षांपूर्वी ठराविक वेळेपुरता अवजड वाहतूक बंदीचा निर्णय झाला तरी या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. हे सामोरे आले आहे.
खानापूर रोडवर अनेक शाळा-कॉलेज आहेत. कॅन्टोन्मेंट परिसरातील 4, इस्लामिया हायस्कूल, सेंटपॉल हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल आदी शाळा आहेत. सकाळी मुलांना शाळेला जाण्याची घाई असते. अनेक पालक दुचाकीवरून आपल्या मुलांना सोडतात. तर अनेक मुले वर्दीच्या रिक्षातून शाळेला जातात. याचवेळेला सुसाटवेगाने येणारे वाळू, विटा वाहतुकीचे टिप्पर, ट्रक व इतर अवजड वाहनांमुळे अपघात घडले
आहेत.
प्रशासन समस्यांची दखल घेणार का?
ज्या परिसरात शाळा-कॉलेज आहेत त्या परिसरात वाहतूक पोलिसांचे नियोजन करावे. रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. याकडेही दुर्लक्षच करण्यात आले आहे. तीन दिवसांत घडलेल्या दोन अपघातामुळे अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस व प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. जनक्षोभ भडकण्याआधीच प्रशासन या समस्यांची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.