खाण्याचे पान किंवा विडा, ज्याला आपण मसाला पान किंवा मिठा पान म्हणून ओळखतो. त्याची किंमत किती असू शकेल? याचा विचार आपण फारसा करतच नाही. कारण ती पंधरा-वीस रुपयांच्यावर किंवा फारतर पन्नास रुपये असू शकेल, असे आपल्याला वाटते. तथापि, राजस्थानच्या अलवार जिल्हय़ात एक पानाचे दुकान असे आहे की जेथे 3200 रुपयांचे पान मिळते.
अर्थात हे पान नेहमी तयार केले जात नाही. किंवा ते ऑफ द काऊंटर मिळत नाही. यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते. त्यानंतरच ते करायला घेतले जाते. अलवार शहरात एका पान भांडारात ते मिळते. संपूर्ण भारतात इतके महाग पान कोठेच मिळत नाही, असे बोलले जाते. नवविवाहित नवरा अन् नवरी यांनी एकत्र खाण्याचे हे पान आहे. केवळ त्यांच्यासाठीच ते बनविले जाते, असे या दुकानाचे मालक म्हणतात. लग्नसराईत या पानाला प्रचंड मागणी असते. दूरदूरच्या शहरांमधून या पानासाठी ऑर्डरी येतात. ते ताज्या अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेद्वारे पाठविले जाते. या पानात कोणते पदार्थ घातले जातात, हे टॉप सिपेट आहे. पानाच्या चवीवरून त्याचे काही प्रमाणात अनुमान काढता येते. तथापि, अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना असे पान बनविता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे पान म्हणजे या दुकानाची अनोखी विशेषतः आहे, असे मानले जाते. हे पान केवळ चवीसाठी नव्हे तर त्यातल्या पौष्टिक घटकांसाठीही प्रसिद्ध आहे. या पानामुळे जड अन्नपदार्थांचे पचनही उत्तमरीतीने होते आणि ऍसिडिटी किंवा गॅसेस यांचा त्रास होत नाही. या पानात आयुर्वेदिक पदार्थ घातलेले असतात, असे बोलले जाते.