भारतात पुरातन काळी मोतीबिंदू, मूळव्याध आणि दात काढणे अशा शस्त्रक्रिया होत असत, याचा पुरावा सापडलेला आहे. सुश्रुत संहितेत अशा शस्त्रक्रियांची माहितीही आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा शस्त्रक्रिया हा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, शस्त्रक्रिया करण्याची पद्धती किती जुनी आहे, यावर नुकतेच संशोधन करण्यात आले असून ती 31 हजार वर्षांइतकी जुनी असल्याचे आढळले आहे. शरीराचा दुखरा भाग काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया हजारो वर्षांपूर्वीपासून होत होत्या, हे या संशोधनातून दिसून आले आहे.
30 हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगात शिकारी जमातींमध्ये शिकार करताना हात किंवा पाय जखमी झाल्यास आणि तो बरा होण्यासारखा नसल्यास कापून काढला जात असे. अशाप्रकारे उरलेले शरीर आणि रुग्णाचे प्राण वाचविले जात असत. याच प्रक्रियेला आधुनिक काळात ऍम्प्युटेशन असे म्हणतात. अर्थात त्या काळी शरीराचा भाग कापून टाकण्याची प्रक्रिया आतापेक्षा वेगळी होती. 31 हजार वर्षांपूर्वी सापडलेल्या एका शिकारी बालकाच्या सांगाडय़ाचे संशोधन केले असता त्याचा पाय कृत्रिमरीत्या कापला असल्याचे आढळून आले आहे. त्याचा पाय कुठल्याही अपघातात तुटलेला नसून तो सुरीसारख्या धारदार शस्त्राने मांडीपासून वेगळा करण्यात आल्याचे या सांगाडय़ाच्या अभ्यासावरून स्पष्टपणे दिसून आलेले आहे.
इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावरील एका गुहेत हा 31 हजार वर्षांपूर्वीचा सांगाडा आढळून आला आहे. कार्बन डेटिंग पद्धतीने तो एका बारा वर्षाच्या मुलाचा असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. तो आपल्या टोळीबरोबर शिकारीला गेलेला असताना त्याच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला असावा आणि त्याचा पाय जखमी केला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पाय बरा होण्याच्या स्थितीत नसल्याने तो कापून टाकला असल्याचे दिसून येते. त्यानंतर त्याला कापलेल्या पायाच्या जागी लाकडाचा आधार देण्यात आल्याचेही अनुमान आहे. कारण अशाप्रकारचे लाकडाचे तुकडे जवळपास सापडलेले आहेत. सात हजार वर्षांपूर्वीसुद्धा एका वयस्कर माणसाचा डावा हात शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आल्याचे या माणसाच्या सांगाडय़ावरून समजले होते.