सुरक्षेविना पर्यटकांचे हकनाक बळी जाण्याच्या घटना
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर असलेल्या किटवाड (ता. चंदगड) येथील धबधब्यात चार तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धबधबा परिसरात पर्यटकांसाठी कोणत्याच सुविधा आणि सुरक्षितता नसल्याने पर्यटकांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायत, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खाते याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल आता पर्यटकांतून उपस्थित होत आहे.
अलिकडच्या काही वर्षात किटवाडचा धबधबा नावारूपाला आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. विशेषतः बेळगाव परिसरातील पर्यटक अधिक प्रमाणात दाखल होत आहेत. दरम्यान, पर्यटकांतून स्टंटबाजी करणे, अतिधोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, धरणात पोहण्यासाठी उतरणे, युवकांकडून मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पर्यटकांना हकनाक जीव गमवावा लागत आहे.
बेळगाव, चंदगड, आजरा आदी भागातून शैक्षणिक सहली काढल्या जात आहेत. मात्र, धबधबा आणि धरणाच्या ठिकाणी कोणतीच सुरक्षा नसल्याने अतिउत्साहाच्या भरात पर्यटक पाण्यात उतरताना दिसत आहेत. दरम्यान, धबधब्याच्या आणि धरणाच्या काठावर मोहापायी सेल्फी घेण्याच्या नादात पाण्यात बुडत आहेत. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायत आणि प्रशासनाने किटवाड धरणावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.