अध्याय विसावा
मनाला ताब्यात कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करताना भगवंत म्हणाले, मन जेव्हा स्वतः स्वरूपामध्ये समाधान पावते, तोच योग अत्यंत श्रेष्ठ असून त्याच्या योगाने जीवाला आणि शिवालाही समाधान होते. जीवाची आणि परमात्म्याची एकात्मता करणे तोच खरोखर श्रेष्ठ योग’ होय. याविषयीचे निरूपण अश्वाचे उदाहरण देऊन भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, खोगीर न घातलेल्या घोडय़ाला चाबुकस्वार जसा आपल्या हुकमात चालवितो, त्याला मागच्या बाजूने कोरडे लगावतो व पुढे नीट चाल लावण्यासाठी वाकडेतिकडे पाऊल पडू नये म्हणून दोऱयानी रेटून धरतो त्या वेळी तो जे जे पाऊल योग्य रीतीने टाकतो, त्याबद्दल तो त्याला शाबासकी देतो व ‘भले भले’ म्हणून चुचकारतो. पण जेथे त्याचे पाउल वाकडे पडते, तेथे तो वर्मावर फटकारा मारतो.
तो जेव्हा अडून हट्टाने आपली खोड टाकतच नाही, तेव्हा त्याला तो थोडीशी मोकळीक देतो, अशा युक्तिप्रयुक्तीने तो त्याला आपल्या कब्जात आणतो. आपल्याला पूर्णपणे कह्यात ठेवण्याची धन्याची तीव्र इच्छा घोडा जाणतो आणि घोडय़ाचे मन धनी जाणतो. असे उभयतांचे मन एक झाल्यामुळे घोडा लगामावाचूनही हुकमात वागू लागतो. अडणे, उडणे हा हा म्हणता सोडून देतो आणि मग मोकळाच धन्याने शिकविल्याप्रमाणे नाचू लागतो. ह्याप्रमाणे कह्यात आणलेला घोडा, धन्याच्या मर्जीप्रमाणे कच्च्या सुतानेही हवा तसा नाचू लागतो. अशाच प्रकारे मनाचेही दमन करावे. मुख्यतः मनावर विजय मिळवावा, हेच ‘परमयोगा’ चे साधन आहे.
परमयोगाच्या माध्यमातून मनोजय साधला की, सांख्ययोगाची तत्वे जीवनात अनुभवता येतात. सांख्ययोगानेच माझी प्राप्ती होते, कारण संसाराची स्फूर्ति ही मिथ्या असून ब्रह्मसंविती हीच सत्य आहे. हे निरूपण गहन ज्ञानात्मक आहे. तरी ते गुह्यज्ञान तुला मी सांगतो. हे त्रिगुणात विद्यमान असूनही गुणकार्याला अलिप्त असते. देव गुह्यज्ञान सांगत आहेत हे लक्षात घेऊन उद्धवाने जीवाचे कान करून ऐकायचे ठरवले. उद्धवाची आवड पाहून आत्मज्ञानरूप गुणाचा केवळ समुद्र, असलेले यादवश्रे÷ श्रीकृष्ण म्हणाले, सांख्यशास्त्रामध्ये प्रकृतीपासून शरीरापर्यंत पदार्थांच्या उत्पत्तीचा जो क्रम सांगितला आहे आणि ज्या क्रमाने त्यांचा प्रकृतीमध्ये लय सांगितला आहे, त्याचे मन स्थिर होईपर्यंत सतत चिंतन करावे.
सृष्टीच्या पूर्वी जे अलिप्त असते तेच सृष्टीच्या उत्पत्तीत व सृष्टीच्या स्थितीत म्हणजे सृष्टीमध्ये महत्तत्त्वादिकांपासून तो देहापर्यंत व्यापून राहणारे जे तत्त्व तेच ब्रह्म होय. सृष्टीच्या विशेष स्थितीमध्ये गुणकार्याला तेच प्रकाशित करते आणि शेवटी गुणकार्याला ग्रासून टाकते व अवशेषही तेच राहते. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी भगवंत एक सुंदर उदाहरण देतात.
दागिने घडविले नसतानाही सोने हे सोनेच असते आणि दागिने घडविले तरी त्याचा सोनेपणा काही नाहीसा होत नाही किंवा ते दागिने मोडले तरी सोनेपणाला घडण्यामोडण्याचे भय नाही. ढग यावयाच्या आधी आकाश हे शुद्धच असते आणि ढगाच्या आत बाहेरही आकाशच असते ढग वितळून गेले तरी, आकाशामध्ये आकाश अलिप्तपणाने साठलेले असतेच. त्याप्रमाणेच उत्पत्ती, स्थिती व प्रलय ह्यांच्या शेवटी परब्रह्म हे अलिप्तपणाने साठलेले असते. कुंभार जे जे मडके तयार करतो, त्याला मृत्तिका ही व्यापूनच असते, त्याप्रमाणे जे जे तत्त्व उत्पन्न होते, ते ते परब्रह्माने व्यापलेलेच असते. समुद्रामध्ये जी जी लाट उत्पन्न होते, तिच्या आतबाहेर पाणीच असते त्याप्रमाणे महत्तत्त्वापासून तो देहापर्यंत आतबाहेर केवळ चित्स्वरूपच व्यापलेले असते तद्वत् जे जे तत्त्व म्हणून उत्पन्न होते, ते ते चैतन्यस्वरूपानेच व्यापलेले असते.
अशा प्रकारे विचार केल्यास परब्रह्मातून निर्माण झालेल्या वस्तू या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात आणि त्यामुळे परब्रह्मात काही बदल होत नसल्याने परब्रह्माहून भिन्न असे तिळभरही काही नसल्याचे लक्षात येते.
क्रमशः