प्रतिनिधी/ दापोली
शासनाने 25 रुपये घेऊन घरोघर झेंडे दिले, मात्र ज्यांच्याकडे रहायला घरच नाही त्यांनी झेंडा कसा फडकवायचा, असा प्रश्न दापोली तालुक्यातील वणोशीतील आदिवासी पाडय़ावरील व कामानिमित्त दापोलीत स्थलांतरित झालेल्या आदिवासी बांधवांना पडला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र दापोली तालुक्यातील आदिवासी पाडय़ाचा प्रश्न वेगळाच आहे. दापोली तालुक्यात कुडावळे, पिसई, जामगे, विसापूर येथे आदिवासी पाडे आहेत. यातील कुडावळे, जामगे, विसापूर येथील आदिवासी बांधवांची कच्ची पक्की घरे आहेत. मात्र पिसई येथील काही आदिवासी बांधवांना रहायला घरच नाही. ते अनेक वर्ष लाकडाने, गवताने शाकारलेल्या झोपडीत पाणी येऊ नये म्हणून प्लास्टिक टाकून राहतात. मोलमजुरी हे त्यांचे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. त्यांनी मागणी केली तर 25 रुपये घेऊन त्यांना तिरंगा देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली. मात्र तो कसा व कुठे फडकवायचा, हा मोठा प्रश्न या आदिवासी बांधवांसमोर आहे.
मागणी केल्यास तिरंगा पुरवणार
झोपडय़ामध्ये राहणाऱया व्यक्ती या गावातील स्थानिक रहिवासी नाहीत. ते दुसऱया गावातून कामासाठी आलेले कामगार आहेत. मात्र ते अनेक वर्ष गावात रहात असल्याने त्यांच्या मुलांना स्थानिक शाळेत दाखल करून घेण्यात आले आहे. काहींची गावात पक्की घरी नसून अस्थायी झोपडय़ा आहेत. मात्र त्यांनी मागणी केल्यास त्यांना तिरंगा पुरवण्यात येईल. मात्र त्यांनी तिरंग्याचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे.
– सतीश चव्हाण
ग्रामपंचायत सदस्य, वणोशी
ग्रामस्थ साशंक
शासनाने ग्रामपंचायतपासून पोस्ट ऑफिसपर्यंत अनेक ठिकाणी 25 रुपयात तिरंगाही उपलब्ध करून देला आहे. दापोली तालुक्यात काही वाडय़ांनी ‘एक वाडी एक तिरंगा’ धोरण अवलंबले आहे. तिरंग्याची संहिता वैयक्तिकरित्या पाळली जाईल की नाही, या बाबत अनेक ग्रामस्थ साशंक आहेत. शिवाय 15 ऑगस्टनंतर तिरंगा कुठे जमा करायचा, या बाबत काही स्पष्ट सूचना नाहीत. यामुळे आपल्याकडून तिरंग्याचा अवमान होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काही वाडय़ांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.