सुधाकर काशीद,कोल्हापूर
रंकाळा म्हणजे बारा महिने भरलेला जलाशय.रंकाळा म्हणजे शहरात पश्चिमेकडून हळुवार प्रवेश करणारी थंडगार वाऱ्याची झुळूक.रंकाळा म्हणजे संध्यामठ.रंकाळा म्हणजे शालिनी पॅलेस.आणि रंकाळा म्हणजे शेकडो ज्ञात अज्ञात जलचर व पक्षांचे आश्रयस्थान.पण फुकट मिळालेल्या देणगीची किंमत जशी स्वीकारणाऱ्यां च्या दृष्टीने शून्य असते तशी शून्य किंमत रंकाळा तलावाच्या वाट्याला आली आहे.आता रंकाळा म्हणजे टेंडर ,रंकाळा म्हणजे भेलपासून इटालियन पदार्थपर्यंत सारे काही मिळणारी खाऊ गल्ली,शेकडो गाड्यांचे पार्किंग,नियोजित स्केटिंग रिंग,उदघाटना आधीच एका नेत्याचे नाव देऊन ठेवलेले नियोजित उद्यान अशी ओळख त्याच्या वाट्याला आली आहे.या साऱ्या बदलात मूळ रंकाळा कोठे आहे? आणि कसा होता हे शोधायची वेळ आली आहे.
कोल्हापुरात प्रताप आचरेकर नावाचे एक देशभरात ओळख असलेले आर्किटेक होते ते जगभरात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरायचे.ते म्हणायचे.कोल्हापूरचा भवानी मंडप,जुना राजवाडा व रंकाळा तलाव जर परदेशात असता तर जगभरातले पर्यटक तेथे येतील इतक्या छान पद्धतीने त्या देशाने त्याला जपला असता.पण अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था कोल्हापूरकरांनी रंकाळा तलाव,जुना राजवाडा परिसराची करून ठेवली आहे.आणि आर्किटेक प्रताप आचरेकर यांचे हे म्हणणे आता क्षणाक्षणाला पटू लागले.
रंकाळा तलाव कोल्हापूरला मिळालेली निसर्गाची मोठी देणगी आहे.या तलावाच्या ठिकाणी पूर्वी दगडाच्या खाणी होत्या तिथला दगड काढून अंबाबाईचे देऊळ बांधले.दगड काढून राहिलेल्या खोल जागेत पाणी साचत गेले.व पुढे त्याचे अखंड तलावात रूपांतर झाले.की त्याची सर्वसाधारण ओळख आहे.त्यात सत्यही आहे.पण याच तलावाने पुढे त्या काळातील कोल्हापूर शहरास पाणीपुरवठा करून शहराला जगवले.असंख्य जलचरांना जपले.पश्चिमेकडच्या टोकाच्या या तलावावरून वाहणारे थंडगार वारे शहराला शीतलतेचा एक वेगळाच अनुभव देऊ लागले.चौथ्या शिवाजी महाराजांच्या काळात तलावाला भक्कम दगडी बंधारा बांधला गेला.पुढे तो चौपाटी म्हणून ओळखला जाऊ लागला.ही चौपाटी म्हणजे बंधारा आहे,हा इतिहासच बंधाऱ्याच्या भरावाखाली बुजला गेला.
कोल्हापुरातला तलावाचा परिसर म्हणजे निसर्गाने केलेली लयलूटच आहे.खरे सौंदर्य तेच आहे.पण रंकाळा तलावाला कृत्रिम सजावटीची किनार लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.तलावाच्या पाण्यापेक्षाही रंकाळ्याच्या टेंडर या शब्दाला खूप महत्त्व आले आहे. आणि अशा सजावटीमुळे तलावाचे मूळ सौंदर्य हरवत चालले आहे. रंकाळा तलाव, रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस या रस्त्यावरून दिसायचा बंद झाला आहे.या रस्त्यावर रंकाळा दडून जाईल इतक्या हातगाड्या आहेत आता तर भाजीपाला, फळे, स्वेटर, कपडे याचे असंख्य स्टॉल लागले आहेत. बाहेरून आलेल्या वाहनांच्या रांगा आहेत. त्या गराड्या त सध्या रंकाळा दडून गेला आहे.वास्तविक रंकाळा मूळ जसा आहे तसा चारही बाजूंनी खुला झाला तर त्याची नजाकत काही औरच असणार आहे.संध्यामठ हा रंकाळ्याच्या कपाळावरचा टिळा म्हणून शोभत होता.हा संध्यामठ आता कधीही कोसळून पडेल अशा अवस्थेत आहे.टॉवरची अवस्था तशीच आहे.
रंकाळ्याचे मूळ जपण्याऐवजी अन्य उपायच जादा केले जात आहेत.रंकाळ्यावर गणेशोत्सव,महाप्रसाद जाहिरातीचे शूटिंग,रात्री रंकाळ्याच्या कठड्या ला लागून खाऊचे स्टॉल लागले आहेत. आता तर भरीत भर म्हणून तलावाच्या नियोजित विकास आराखड्यात रंकाळ्याच्या कोरड्या भागात 500 गाड्यांचे पार्किंग, चक्क स्केटिंग रिंग, एक खाऊ गल्ली होणार आहे. मूळ रंकाळा कसा होता रे भाऊ हे विचारायचीच वेळ त्यामुळे यापुढे कोल्हापूरकरांच्यावर येणार आहे.