ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 62 नुसार वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक अयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नव्या राष्ट्रपती निवडीसाठी 18 जुलैला मतदान होणार असून, 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
कशी होते राष्ट्रपतींची निवडणूक?
राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. या पदाची निवड भारतात इलेक्टोरल कॉलेज प्रणालीद्वारे केली जाते. इलेक्टोरल कॉलेज प्रणाली म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्य राष्ट्रपती निवडीसाठी मतदान करतात. विधान परिषदेचे आमदार आणि नामनिर्देशित आमदारांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करताना आमदार आणि खासदार बॅलेट पेपरवर त्यांची निवड करतात आणि त्यात ते त्यांची पहिली पसंती, दुसरी पसंती आणि तिसरी पसंती नमूद करतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होते. विशेष म्हणजे कोणताही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही. प्रत्येक मतदाराला कोणत्याही उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र असते. मतमोजनीवेळी आधी प्रथम पसंतीची मते मोजली जातात. जर पहिल्या पसंतीच्या उमेदवाराने विजयासाठी आवश्यक वेटेज मिळवले तर तो विजयी घोषित केला जातो आणि जर ते मिळाले नाही तर दुसऱ्या आणि नंतर तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
काय आहे या निवडणूक प्रक्रियेतील वेगळेपण?
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराच्या मताला वेगळे मूल्य असते. आमदार, खासदारांचे मत मूल्य हे एका विशि÷ फॉर्म्युल्याने ठरवले जाते. घटनेच्या कलम 55 (2) मध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. खासदार आणि आमदारांनी टाकलेल्या मतांची किंमत एकापेक्षा जास्त असते. एकीकडे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या मतांचे मूल्य 708 आहे. त्याचवेळी आमदाराच्या मताचे मूल्य प्रत्येक राज्यांमधील लोकसंख्येच्या जनगणनेवर गोष्टींवर अवलंबून असते. आमदाराच्या मताची गणना करण्यासाठी राज्याच्या लोकसंख्येला विधानसभेतील आमदारांच्या संख्येने भागले जाते. हा निकाल पुढे 1000 हजारांनी भागला जातो. 2026 सालापर्यंत विविध राज्यांमधील 1971 च्या जनगणनेप्रमाणे असलेली लोकसंख्या या भागाकारासाठी वापरावी असे या कलमाच्या एक्सप्लेनेशनमध्ये लिहिले आहे.
उदा. महाराष्ट्राची 1971 च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या 5,04,12,235 होती. सध्या महाराष्ट्र विधानसभेत एकूण निर्वाचित सदस्यांची संख्या 288 आहे. तेव्हा लोकसंख्या ÷ 288 = 1,75,042. या भागाकाराला 1000 ने भागल्यास उत्तर येईल 175.042 म्हणजेच राऊंडऑफ करुन 175. हे महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांचे एकूण मूल्य झाले. सर्वाधिक मतं मूल्य हे उत्तर प्रदेशाच्या आमदाराचे 208 इतके आहे तर सर्वात कमी 8 गोव्याच्या आमदाराचे आहे. 288 × 175 = 50,400. अशा पध्दतीने सर्व राज्य विधासभांमधील सदस्यांचे मूल्य काढले तर याची बेरीज 5,49,474 येईल. याशिवाय राज्यसभा आणि लोकसभा खासदारांच्या मतांचे मूल्य 5 लाख 59 हजार 408 इतके आहे. तर आमदारांच्या बाबतीत ही संख्या 5 लाख 49 हजार 495 एवढी आहे. अशा स्थितीत इलेक्टोरल कॉलेजचा आकडा 10 लाख 98 हजार 903 वर पोहोचला आहे. राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी 5 लाख 49 हजार 442 मतांची गरज असते.
कोण लढवू शकतं ही निवडणूक?
राष्ट्रपती होण्यासाठी काही निकष आहेत. राष्ट्रपतीपदाची उमेदार व्यक्ती भारताची नागरिक असावी. तसेच त्या व्यक्तीचं वय 35 हून अधिक असावे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता केलेली असावी. 50 निवडलेल्या आमदार वा खासदारांचा त्याला पाठींबा असावा. त्याने 15 हजार रुपयांची अनामत रक्कम आरबीआयमध्ये जमा केलेली असावी.