शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत : हवामान बदलल्याचा सर्वांना फटका
खानापूर : खानापूर तालुक्यात यावर्षी वळिवाने पूर्णपणे हुलकावणी दिली असून गेल्या दोन महिन्यांत वळिवाचा एकही मोठा पाऊस झालेला नाही. हवेत उष्णतेने उच्चांक गाठला असून उष्म्यामुळे लोकांची लाहीलाही होत आहे. सर्वसामान्य जनता आणि शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. याचा परिणाम यावर्षीच्या खरीपावर होणार आहे. गेल्या दोन महिन्यांत उष्णतेने उच्चांक गाठला असून खानापूर तालुक्यात उष्णतेने 39 व 40 अंशापर्यंत पारा चढला असला तरी वळिवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमालीची वाढली आहे. त्यामुळे उष्णताही वाढली असून या बदललेल्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मागील दोन महिन्यात जरी उष्णतेने उच्चांक गाठला असला तरी काहीवेळा रात्री अचानक हवेत गारवा निर्माण होऊन दव पडत आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे शेतकरी अनुमान व्यक्त करत आहेत. तालुक्याच्या आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच सर्व नदी-नाल्यांनी आपला तळ गाठला असून पाण्याचे दुर्भीक्षही काही ठिकाणी निर्माण झाले आहे. तर कूपनलिकांचीही पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. खानापूर तालुक्यात उष्णता वाढल्याबरोबर वळिवाचा पाऊस होत असतो. मात्र हवामानातील बदलामुळे यावर्षी वळिवाचे पाऊसच झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर उन्हाळी पिकावर परिणाम झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
भात पेरणीही लांबणीवर
पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने भात पेरणीही लांबण्याची चिन्हे दिसत आहे. मे महिना अर्धा संपला तरी अद्याप शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केलेल्या नाहीत. जर पाणथळ जमिनीतील पेरण्या लांबल्या तर सुगीवर परिणाम होऊन उत्पादनावर परिणाम होणार आहे, असा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. माळरानावरील भात पिकावरही याचा परिणाम होणार आहे. यासाठी शेतकरी वळिवाच्या प्रतीक्षेत असून आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.