पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा : आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप, हुंडाबळीप्रकरणी कारवाईची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हुंडय़ासाठी सासरच्या जाचाला कंटाळून हालभांवी (ता. बेळगाव) येथील एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी काकती पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. हे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप हुल्यानूर ग्रामस्थांनी केला आहे.
काकती पोलिसांविरुद्ध ग्रामस्थ संतप्त झाले असून बुधवारी त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी गावकरी व आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या कुटुंबीयांचे गाऱहाणे ऐकून घेतले.
रेणुका भरमाप्पा नायक (वय 20) या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. हुल्यानूर येथे रेणुकाचे माहेर असून हालभांवी येथे सासर आहे. हुंडय़ासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचाला कंटाळून केवळ पाच महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेने आपले जीवन संपविले आहे.
पतीसह 5 जणांविरुद्ध एफआयआर
यासंबंधी पतीसह पाच जणांविरुद्ध काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप संबंधितांवर कारवाई केली नाही. या उलट एका संशयिताला पोलीस स्थानकात आणले होते. काही नेत्यांच्या सांगण्यावरून त्याला सोडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खास करून काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. हे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलीस अधिकारी आरोपींना पाठिशी घालत आहेत. एसीपी गिरीश यांनीही व्यवस्थित चौकशी केली नाही म्हणून आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढावा लागला, असे रेणुकाच्या कुटुंबीयांनी सांगितले.