वाळवा / वार्ताहर
गावातला माणूस शंभर वर्षे जगावा, म्हणून गावच्या सरपंचाने प्रयत्न केले पाहिजेत, ग्रामपंचायतीला गावातल्या लोकांच्या आरोग्याविषयी आस्था व जाणीव असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पाटोदा (जिल्हा अहमदनगर) गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. नागठाणे ता. पलूस येथे सार्वजनिक मोफत वाचनालय व नागठाणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. वृषाली प्रशांत पाटील होत्या.
व्याख्यानमालेचे हे १७ वे वर्ष आहे, दुसरे पुष्प गुंफताना भास्कर पेरे पाटील बोलत होते. प्रारंभी बालगंधर्वांच्या प्रतिमेचे पूजन भास्कर पेरे पाटील व सरपंच वृषाली पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष भिकाजी साळुंखे-पाटील- पाटोळे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भास्कर पेरे पाटील म्हणाले मी ७ वी शिकलो आहे, तुमच्या आणि आमच्या गावातील, सर्वच गावातील समस्या एकच आहेत. रस्ते, इमारती यांची कामे तर शासन करीत असते. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते. ग्रामपंचायतींनी पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा केला पाहिजे, गावाच्या नैसर्गिक वाढीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे, मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले पाहिजेत व शेतकऱ्यांच्या समस्या देखील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सोडवल्या पाहिजेत. शेतकरी शेतात राब राब राबतात, परंतु त्यांना शेतीचा फायदा होत नाही. व्यापारी मात्र एक दिवसात लखपती होतात आणि शेतकरी कर्जबाजारी भीकेकंगाल राहतो. याचा विचार होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बुद्धिचातुर्याचा वापर सुद्धा बाजारपेठेमध्ये करणे गरजेचे आहे. गावच्या लोकसंख्येवर सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गावातील निराधार लोकांना ग्रामपंचायतींनी सांभाळले पाहिजे. गावागावातल्या समस्या सुटल्या तरच आपला देश महासत्ता बनणार आहे.
या कार्यक्रमासाठी कुमार शिंदे, भगवान अडीसरे, अरुण कापसे, नितीन माळी, धनाजी पाटील, आनंदा कोरे, झुंजार पाटील, प्रताप मोकाशी, संपत पाटोळे, पै. सुहास माने, पै. संजय शिंदे, शिरगावचे सरपंच राजाराम शिंदे व वाचनालयाचे माजी अध्यक्ष जयवंत मदने, माजी सभापती सीमाताई मांगलेकर, माजी सरपंच जगन्नाथ थोरात, सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, ग्रंथपाल प्रकाश लाड, सनी लटके आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांच्यासाठी लकीड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून १५ भाग्यवान महिलांना पैठणी साड्यांचे वाटप भास्कर पेरे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.