प्रतिनिधी /फोंडा
दुर्भाट गावातील त्रैवार्षिक दृष्टादेवीचा उत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. देवीचे विधीवत पूजन, आरत्या, भाविकांसाठी महानैवैद्य झाला. दुर्भाट तसेच शेजारील आडपई, तळावली या गावांसह राज्याच्या विविध भागातील शेकडो भाविकांनी दृष्टादेवीचे दर्शन घेऊन नवीन नवस केले तर काहींनी आपले जुने नवस फेडले.
अन् दृष्टादेवीमुळे गावावरील संकट टळले
जुवारी नदीच्या काठावर वसलेल्या दुर्भाट गावात चतुर्थीच्या काळात दृष्टादेवी पुजण्याची जुनी प्रथा आहे. देवीच्या या व्रतामागे तसेच कारण झाले. साधारण दिडशे वर्षांपूर्वी दुर्भाट गावात आलेल्या एका महामारीने बऱयाच लोकांचे बळी घेतले. विशेषतः लहान मुलांवर या महामारीने घाला घातला. दिवसाकाठी तीन ते चार मुलांचे त्यात बळी जाऊ लागले. गावांवर आलेले हे भयंकर संकट टळावे यासाठी जाणकारांनी दोनखांब कवळे येथील श्री बेताळ देवाचा कौल घेतला. दृष्टादेवीचा व्रत करा, गावावरील संकट दूर होईल असा देवाने कौल दिला व खरोखरच ही महामारी संपुष्टात आली. तेव्हापासून दुर्भाट गावात चुतर्थीच्या काळात तिसाल म्हणजेच त्रैवार्षिक दृष्टादेवीची पुजा करण्याची प्रथा सुरु झाली. येथील दिलीप वासुदेव फडते यांच्या निवासस्थानी देवीची विधीवत पूजा केली जाते. सुरुवातीला त्यांचे आजोबा विठ्ठल फडते, त्यानंतर वडिल वासुदेव फडते व सध्या जल्मी म्हणून दिलीप हे देवीची पूजा करतात.
दृष्टादेवी ज्यावर्षी येते त्यावर्षी गावातील सर्व संबंधीत कुटुंबीयांच्या गणपतींचे दिड दिवसांत विसर्जन केले जाते. आडपई गावात पाच दिवसांचे विसर्जन झाल्यानंतर दृष्टीदेवीची मूर्ती आणून गणपतीच्या मखरात तिची पूजा बांधली जाते. देवीच्या विसर्जनाचेही काही काटेकोर नियम आहेत. मध्यरात्री केवळ जल्मी एकटेच गावातील विहिरीत देवीचे विसर्जन करतात. यावेळी घरातून कुणीही बाहेर पडायचे नाही असा प्रघात आहे.
दृष्टादेवी व्रताची ख्याती पोचली सर्वत्र
दृष्टादेवी ही नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेकांचे मनोरथ पूर्ण होत असल्याने दरवर्षी राज्यभरातील शेकडो भाविक नवस करायला व ते फेडायला या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. पूर्वी दृष्टादेवीची ख्याती दुर्भाट व आसपासच्या गावापुती मर्यादित होती. मात्र कालांतराने गावातून लग्न करुन दिलेल्या मुलींच्या सासरकडील मंडळी व इतर नातेवाईंकामुळे या व्रताचे महात्म्य गोव्यातील विविध भागांत पोचले. गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या विविध भागातून शेकडो भावीक दृष्टादेवीला उपस्थिती लावतात, असे सोसिदाद पेस्कादोर संस्थेचे अध्यक्ष जयनाथ फडते यांनी सांगितले.
भाविकांकडून असेही नवस
दृष्टादेवीच्या दर पुजेला भाविकांकडून आपल्या मनोकामन पूर्ण होण्यासाठी नवस बोलले जातात व काम झाल्यानंतर पुढच्या पुजेला फेडले जातात. मागील दृष्टादेवीला अशाच एका भाविक महिलेने आपल्या जावयाला नोकरी मिळाल्यास पाचशे नारळांची पंचखाद्य अर्पण करण्याचा नवस केला होता. तिची ही कामना पूर्ण झाली. पण पाचशे नारळांचे खोबरे एका दिवसांत किसून त्याची पंचखाद्य बनविण्यास तिला तेवढय़ा महिला व आचारी चतुर्थीच्या दिवसांत सापडणे कठिण बनले. तरीही एका रात्रीत धावपळ करीत तिने ही पंचखाद्य बनविली व देवीला अर्पण करुन नवस फेडला.