बारावी परीक्षेच्या सांगतेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया : सुटकेचा नि:श्वास : वर्षभर अभ्यासाच्या तणावाखाली असलेले विद्यार्थी मुक्त
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेची बुधवारी सांगता झाली. कॉम्प्युटर सायन्स विषयाचा पेपर झाला आणि गेले वर्षभर अभ्यासाच्या तणावाखाली असलेले विद्यार्थी मुक्त झाले. पेपर संपताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘हुश्श सुटलो बुवा’ अशी आरोळी ठोकली. सेल्फी काढत व गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी परस्परांची गळाभेठ घेत एकच जल्लोष केला. परीक्षा केंद्राच्या बाहेर येताच विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या अंगावर शाई उडवून तसेच त्यांच्या पाठीवर वेगवेगळे संदेश लिहून आनंद व्यक्त केला. पीयूसी नंतर विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांना जातात. त्यामुळे यापुढे वर्गमित्र म्हणून त्यांची भेट होईलच, असे नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपला आनंद संदेश लिहून व्यक्त केला. तसेच आता यापुढे कोठे भेटायचे याचेही बेत ठरविले.\ 9 मार्चपासून परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली होते. यामुळे परीक्षा केव्हा संपते आणि स्वच्छंद फिरायला केव्हा मिळते याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती. बुधवारी शेवटचा पेपर झाल्यानंतर आनंद साजरा करण्यात आला. जल्लोष करत अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन पार्टी केली. आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले असून शिक्षकांकडून पेपर तपासणीची तयारी केली जात आहे.
नियोजनामुळे परीक्षा सुरळीत
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 9 ते 29 मार्चदरम्यान पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. एकूण 25 हजार 390 परीक्षार्थींनी 42 केंद्रांवर परीक्षा दिली. शिक्षण विभागाचे कर्मचारी व पर्यवेक्षकांनी केलेल्या नियोजनामुळे परीक्षा सुरळीत पार पडली.
– एम. एम. कांबळे (जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)