अध्याय चोविसावा
भक्त आणि भक्तीबद्दल भगवंत अगदी समरसून बोलत आहेत. ते म्हणाले, उद्धवा जे भक्त चारही पुरुषार्थाना सोडून चारही मुक्तींची उपेक्षा करितात व पाचव्या पुरुषार्थाची भक्ती करतात, ती भक्ती मला प्रिय आहे. असेच भक्त माझे लाडके असतात. माझ्याप्रमाणेच निरिच्छ असणाऱया भक्तांचे मला कौतुक वाटते. आम्ही प्रेमाचे पाहुणे व भावार्थांचे सेवक आहोत. मी सर्व इच्छा नष्ट झालेला असलो, तरी पण मी प्रेमळ भक्तांची इच्छा बाळगतो, इतके त्यांचे प्रेम गोड असते.
मग मी प्रेमळ भक्ताला तत्काळ आपल्या बरोबरीला घेतो आणि शेवटी माझेच सुख मी त्याला देतो. कारण मला प्रेमाची फार आवड आहे. भक्ताला मी जे काही देऊ शकतो त्यापेक्षा त्याचे प्रेम अधिक मोलाचे आहे. मला त्याची बरोबरी करता येत नाही. म्हणून जेव्हा त्याच्याइतके जेव्हा मी देऊ शकत नाही तेव्हा त्याचा मी इमानी सेवक होऊन राहतो. याची एक ना अनेक उदाहरणे देता येतील कारण प्रेमाचा खरा जिव्हाळा आणि भावार्थाचे रक्षण, हे मीच एक जाणणारा आहे. इतरांना ते कळत नाही.
सांगायचेच झाले तर, मला गोपींच्या सहवासात गोडी मानण्याचे काय कारण होते. पण त्यांचे प्रेम अत्यंत निर्मळ होते, म्हणूनच उद्धवा! मला त्यांची अत्यंत आवड उत्पन्न झाली. कुब्जा कुठे सुंदर होती? पण तिच्या प्रेमाची मला आवड होती. मी वनात जाऊन राधेची प्रार्थना करीत असे, ती काय विषयासक्तीसाठी? गोपाळांनी तरी अशी किती भक्ती केली? ते सोवळे होते की ओवळे होते? पण त्यांचे उष्टे घास मी खाल्ले आणि त्यांच्या प्रेमामुळे प्रेमभरात डुलत राहिलो. पांडवांच्या बापाचा मी काय ऋणी होतो? पण त्यांच्यासाठी अनेक अडचणी सोसल्या.
मी सुदाम्याच्या पाया पडलो, ते काय मी त्या सुदाम्याच्या उपकारांनी ऋणी झालो होतो म्हणून? मला काय अन्नाचा दुष्काळ पडला होता, म्हणून यज्ञपत्न्यांजवळ अन्न मागावयाला गेलो? मी भावार्थासाठी भुकेलेलो आहे, म्हणून मी प्रेमाचा पाहुणचार घ्यावयास गेलो. मला काय गोपिकांनी दाव्यांनी बांधिले होते की त्या वेळी माझी शक्ती त्या बंधनांत राहण्याइतकी क्षीण झाली? पण त्यांच्या प्रेमाच्या प्रकारानेच मी श्रीपती पोसला जात होतो. मी कोणाची एक कवडीसुद्धा देणे लागत नसता अर्जुनाची घोडी धूत होतो. धर्माच्या घरी उष्टीही काढली! अशी मला भक्ताच्या प्रेमाची आणि प्रेमळ भक्तांची अत्यंत आवड आहे. ती आवड माझी लौकिकलाज सुद्धा नष्ट करिते व माझ्या मोठमोठय़ा कामांचासुद्धा विसर पडतो.
इतकी त्यांच्या सेवेची मला आवड आहे. सर्व अलंकार घालून आई तिच्या मुलाला मस्तकावर घेऊन लाड करताना तो तेथे मुतला, तरी तिला त्याचा राग येत नाही की, ती त्याला ती कंटाळत नाही. तसेच माझे प्रेमळ भक्त मला सर्वस्वी प्रिय आहेत. अशा प्रकारे भक्तावरील प्रेमाच्या अत्यंत आवडीने मी श्रीकृष्ण भक्तांचा अंकित होऊन राहतो आणि ते माझ्यावर करत असलेल्या प्रेमामुळे त्यांच्या पुढे मागे सदासर्वदा स्वतः उभा असतो. उद्धवा! माझ्यामागे यादवांचा फार मोठा गोतावळा असतानाही तूच मला जो एवढा प्रिय वाटतोस, याला तुझे माझ्यावरचे विलक्षण प्रेम कारणीभूत आहे. हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाने देवाच्या पायांना मिठी घातली. तेंव्हा देवही अंतःकरणापासून अत्यंत आनंदित झाले आणि त्यानी उद्धवाला तत्काळ आलिंगन दिले.
हृदयात हृदय एकरूप झाले, देहात देहाला आलिंगन पडले, मनाशी मन एक झाले, तेव्हा आत्मानंद अगदी पूर्ण भरून वाहू लागला. देव देवपणा विसरले आणि भक्ताला भक्तपणा आठवेनासा झाला. आपण दोघे वेगवेगळे आहोत हे विसरून ते एकरूप झाले. सेव्य आणि सेवक ही गोष्टच नाहीशी झाली. द्वैतभावाची दृष्टीच बंद पडली. आत्म्याच्या ऐक्मयाने भक्तीसाम्राज्याच्या सिंहासनावर दोघांची भेट झाली. स्थूळदेह, लिंगदेह आणि कारणदेह यांनी महाकारणदेह पहावयाचा, पण त्या देहचतुष्टय़ाची आठवण त्या वेळी कोणाला होते? तेव्हा घनदाट आणि परिपूर्ण असे आनंदमय स्वरूप, ज्याला आदी, मध्य व अंतही नाही, ते मूर्तिमंतच प्रगट झाले.
क्रमशः