फिरोज मुलाणी / औंध :
हमाली करणाऱ्या माझ्या वडीलांच्या डोक्यावर महाराष्ट्र केसरी किताबाच्या अपेक्षेचे ओझे आहे याची मला जाणीव आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीतील महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब जिंकून आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याची खूणगाठ मी मनात बांधली आहे. भूतकाळ विसरून नव्या जिद्दीने मी वाटचाल सुरू केली आहे. तमाम मायबाप कुस्तीशौकिनांचे प्रेम माझ्या पाठीशी असल्याने मी निश्चित ध्येय साध्य करीन असा विश्वास महान भारत केसरी सिकंदर शेख याने व्यक्त केला.
तरुण भारतशी सिकंदर मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे बोलत होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादाचा लवलेश देखील त्याच्या बोलण्यात जाणवला नाही. कुस्तीच्या आखाड्यात जात-धर्म पाहिली जाते का? या प्रश्नावर तो म्हणाला महाराष्ट्रातील कुस्तीला मोठा वारसा आणि परंपरा आहे. लोकांनी कुस्तीवर भरपूर प्रेम केले आहे यामुळेच कुस्ती आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मैदानात कुस्तीशौकिन पैलवानाचा खेळ बघतात त्याची जात पहात नाहीत. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या पैलवानाला लोक डोक्यावर घेतात याचा अनुभव मी आजही घेत आहे. पैलवानाला जात आणि धर्म नसतोच कुस्ती हाच आमचा श्वास आणि धर्म आहे. लालमाती ही आमची माता आहे तीने आम्हाला कुशीत आधार दिल्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहचलो आहे. लाल मातीचा पांग फेडण्यासाठीच मी आखाड्यात कष्ट करणार आहे.
कोल्हापूरपर्यंतचा प्रवास कसा होता?
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हे माझे मूळ गाव आहे. घरात आजोबापासून कुस्तीचा वारसा असला तरी डोक्यावर फाटक्या परस्थीतीचे आभाळ होते. वडीलांनी कुस्तीत पाऊल ठेवले परंतु गडगडलेल्या परिस्थितीमुळे कुस्ती सोडून डोक्यावर हमालीचे ओझे घेतले. हमालीच्या कामामुळे कुटुंबांच्या उदरनिर्वाह सुरळीत झाला. मात्र डोक्यातील कुस्तीची नशा त्यांना शांत बसून देत नव्हती त्यामुळे दिवसभर कामाने थकले तरी सायंकाळी भाऊ हुसेन आणि मला घेऊन ते तालमीत यायचे वडीलांच्या बरोबर वस्ताद चंदू काळे सुध्दा मार्गदर्शन करायचे. मी चटकदार कुस्त्या करीत असल्याने मला पुढे कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय झाला परंतु आर्थिक प्रश्न उभा होताच. दुखण्याने डोके वर काढल्याने वडीलांची हमाली थांबली होती. थोरला भाऊ हुसेन पुढे आला आणि हमालीचे ओझे त्याने पाठीवर घेतले. सोबतच रमेश बारस्कर आणि बाळू चौरे यांनी देखील आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यामुळे कोल्हापूर पर्यंतचा प्रवास सुरळीत झाल्याचे सिकंदर याने सांगितले.
विश्वास हरगुले यांचे मार्गदर्शन कसे झाले?
कोल्हापूरला गंगावेस तालमीत आल्यावर वस्ताद विश्वास हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली माझी नवीन इनिंग सुरू झाली. घरी वडील आणि भाऊ यांच्या पाठीवरील ओझ्याची जाणीव मला होतीच त्यामुळे कष्ट आणि सरावात सातत्य राखले आक्रमक कुस्ती करण्यावर भर दिला वस्तादांचे अचूक मार्गदर्शन यामुळे कोल्हापूरातून माझा सुरू झालेला प्रवास नेटाने सुरू आहे. उत्तर भारतातील खास करून पंजाब मधील मल्लांशी दोन हात केल्यामुळे मोठे आव्हान पेलण्याची क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण झाला. कोरोना संकट असले तरी माझ्याद्रुष्टीने संधी होती. सरावात सातत्य ठेवून याच काळात उत्तर भारतात कुस्त्या केल्या मोठा पैलवान व्हावे हे वडीलांचे स्वप्न पूर्ण करता आले यामुळे नावही झाले आणि आर्थिक फायदा सुध्दा झाला यामागे माझ्या वस्तादांचे मोठे पाठबळ असल्याचे त्याने आवर्जून सांगितले
स्पर्धेतील कामगिरी बद्दल काय ठरवले आहे?
कोरोना महामारीमुळे दोन वर्षात स्पर्धा झाल्या नाहीत. मी सातत्याने मैदानी कुस्त्या करीत असलो तरी यापुढे स्पर्धेत देखील सहभागी होणार आहे. स्पर्धेत लढण्यामुळे नवीन डावपेच तंत्रज्ञान शिकण्यासाठी मिळते त्याचा मोठा फायदा होत असल्याचे सांगून माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यंदा स्पर्धेवर देखील लक्ष केंद्रित करणार आहे.
महेंद्र गायकवाड गुणी मल्ल
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती गटातील अंतिम फेरीत माझी आणि महेंद्र गायकवाडची कुस्ती झाली. आखाड्यात लढताना जिद्द आणि इर्षा करावी करावी लागते. कुस्ती संपली कि दोस्ती पूर्ववत सुरू होते. आम्ही दोघेही सोलापूर जिल्ह्यातील आहोत आणि सोलापूरचे मल्ल अंतिम फेरीत लढतात याचा देखील अभिमान आहे. आम्ही दोघे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलो आहे. परिश्रम आणि कष्टातील सातत्य यामुळे इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. महेंद्र गुणी आणि कष्टाळू पैलवान आहे.
बक्षिसाची लयलूट
सिकंदरने आतापर्यंत विद्यापीठस्तरावरील स्पर्धा आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवली आहे. सेनादलात नोकरी मिळाल्यामुळे त्याची मैदानी घौडदौड सुरुच आहे. देशभरात कुस्त्या करून थारगाडी, ट्रक्टर, अल्टो, शिवाय बुलेट, टीव्हीस दुचाकी, स्प्लेंडर गाड्या आणि चाळीस मानाच्या गदा जिंकून तो कुस्ती शौकिनांच्या हदय सिंहासनावर आरुढ झाला आहे. देशभरात त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
अफवावर विश्वास ठेवू नका
माझे नाव वापरून सोशल मीडियावर अनेक फेक अकॉउंट अज्ञात लोक चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे. चुकीच्या पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक मुद्दाम करीत आहेत. त्यानी टाकलेल्या पोस्टशी माझा कसलाही संबध नाही, सर्वांना विनंती आहे फेक अकाउंटद्वारे आलेल्या पोस्टवर अफवावर विश्वास ठेवू नये.