अध्याय एकविसावा
भगवंत निष्काम भक्तीचे महत्त्व उद्धवाला पटवून देत आहेत ते म्हणाले, भात टाकून पेज प्यावी, त्याप्रमाणेच सकामाचे फल भोगणे आहे. असे जे सकाम आणि अत्यंत दुर्बुद्ध असतात ते स्वधर्माच्या सिद्धीला मुकतात. म्हणून देव त्यांना ‘कुबुद्धी’ असे म्हणतात विषयांची इच्छा करणारे दीनहीन, लोभी पुरूष, स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात. अग्नीच्याद्वारा सिद्ध होणाऱया यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात. त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक, पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होते. एव्हढेच नव्हे तर त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही. सकामांची तृष्णा कधीच पुरी होत नसते. कामाच्या इच्छेने तो सर्वकाळ दीन असतो, त्यामुळे त्याला ‘कृपण’ असे म्हणतात. कृपणत्वामुळे तो लोभी होतो आणि लोभामुळे त्याचे ज्ञान महामोह ग्रासून टाकतो. त्यावेळी बुद्धीमध्ये अंतर्बाह्य तमोगुणच भरून उचंबळू लागतो. तमोगुणाने वृत्ती भरली म्हणजे आंधळय़ाच्या संगतीने अंधेऱया रात्री आडरानात चुकावे त्याप्रमाणे गत होते. विवेकाची संगत चुकली की, आंधळी वृत्ती अत्यंत मुग्ध होते. मुग्धपणामुळे कर्म कोणते आणि त्याचे फळ काय हे त्याला स्पष्ट कळत नाही. जगात माझी स्थिती कोणती? पुढे आपली गती काय? हे त्याला काहीच कळत नाही. कर्माची प्रशंसा करून त्यायोगे इंद्रियांना तृप्त करणारे लोक ज्या परमात्म्यापासून हे विश्व उत्पन्न झाले आहे आणि जो त्याच्या हृदयातच विराजमान आहे त्याला पाहू शकत नाहीत. मी हृदयात असतो खरा, पण मी सर्वांना दिसतोच असे नाही. त्यासाठी माझ्यावर उत्कट प्रेम हवे. जे माझ्यावर उत्कट प्रेम करतात त्यांनाच त्यांच्या हृदयातील माझी उपस्थिती जाणवते पण माझी सकाम आराधना करणारे वरवर दिसणाऱया गोष्टीनाच भुलतात, याला काय म्हणावे? खरं म्हणजे नाम, रूप, किंवा अनेक प्रकारचे वर्ण, अनेक निरनिराळय़ा वस्तू म्हणजे हे जग असा जो त्यांना बोध होतो, तोही माझ्याच ज्ञानप्रकाशाने होत असतो पण ते ज्याला जग समजतात त्या नामरूप किंवा जातिभेद यांचा माझ्याशी काही संबंध नाही. आकाश जरी पाण्यात बुडालेले दिसले, तरी ते काही पाण्याच्या ओलेपणाने भिजत नाही. त्याप्रमाणे मीही जगाच्या आकाराने असून जगाच्या गुणदोषापासून अलिप्त असतो. असा मी विश्वात्मा व विश्वंभर, विश्वमूर्ती व विश्वेश्वर, पण विषयोपभोगात रमलेले अज्ञानी लोक मला जाणत नाहीत आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. ज्याप्रमाणे डोळय़ांपुढे गर्द अंधारी आली किंवा जो भयंकर अंधाऱया गुहेमध्ये सापडतो, त्याला मागचे पुढचे काही दिसत नसल्यामुळे तो अकस्मात मोठय़ा खड्डय़ात पडतो, त्याप्रमाणे विषयासक्त लोक अत्यंत मोहममतेच्या भ्रांतीने व अज्ञानरूप निदेने अंतर्बाह्य व्याप्त होऊन अज्ञानाच्या विशाल गर्तेत पडतात. माझ्या वेदाचा अर्थ न कळल्यामुळे जे निखालस कामासक्त होतात आणि मी जवळ असूनही मला न ओळखता अधःपतित होतात. तो मी किती जवळ आहे असे विचारशील तर मी सर्वांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस राहतो. उद्धवा माझ्या वेदाचा भाव अगम्य आहे पण त्यातील गूढार्थ न समजल्यामुळे सकाम मनुष्य मोठय़ा उत्साहाने स्वर्गालाच सत्य मानतो!
केवळ रुची उत्पन्न होण्यासाठी वेदाने स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे पण तेच खरे मानून कामलुब्ध लोक अनेक प्रकारची स्वर्गादिक साधने मोठय़ा उत्साहाने करू लागतात. स्वतःला मांसभक्षण करायला मिळावे म्हणून यज्ञाचे निमित्त करतात. आपली इच्छा पूर्ण होण्याकडेच त्यांची दृढतर प्रवृत्ती असल्यामुळे अविधीनेच पशूची हत्या करतात. अशांना देहाच्या अंती ते मारलेले पशुच मारायला उठतात. हातात तलवारी घेऊन सूड घेण्याकरिता यमाच्या दारांत ते उभे असतात. त्यांना स्वर्गसुख कशाचे? अविधीने साधन केल्यामुळे ते महामुर्ख अघोर नरकाला मात्र जातात. अशा प्रकारे सकाम लोक संपूर्ण बुडतात. यथेच्छ मांसभक्षण करण्याकरिता स्वेच्छेनेच पशु वधाला आळा घालण्यासाठी वेदाने केवळ यज्ञाकरिताच पशूचे हनन करावे असा निर्बंध लावून दिला आहे. त्यातही देश, काल, वर्तमान, मंत्र, तंत्र, विधी, विधान आणि सारे द्रव्य ही शुद्ध असावीत असाही निर्बंध घातलेला आहे.
क्रमशः