ऑनलाईन टिम : म्हैसूर
जेष्ठ अभिनेते आणि प्रकाश राज यांनी भाजपवर खादी कामगारांना बेरोजगार करून त्यांना अपमानित केले आहे. असा आरोप केला. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी पॉलिस्टर राष्ट्रध्वज वाटून खादी कामगारांचा विश्वासघात केला आहे असे सागून भाजप सरकारच्या राष्ट्रवादाला काही अर्थ नाही असेही ते म्हणाले.
कर्नाटकातील म्हैसूर येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश राज म्हणाले, “मला भाजपची राष्ट्रवादाची कल्पना आणि त्यांचे देशावरील प्रेम समजत नाही. जर त्यांचे भारतावर इतके प्रेम असेल तर त्यांनी महागाई कमी करण्यावर आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यावा. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशातील खादी कामगार आपला राष्ट्रध्वज बनवत आहेत आणि आता भाजप सरकारने वितरित केलेले पॉलिस्टर कापडाचे ध्वज त्यांची रोजीरोटी अडचणीत आणत आहेत.”
प्रकाश राज यांनी सत्ताधारी असलेला भाजप जादा कर लादून देशातील लघुउद्योग मोडकळीस काढत असल्याचा आरोपही केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “गरीब विडी कामगारांनी रक्त आणि घाम गाळून विड्या वळल्या पण या सरकारने त्यांच्यावर २८ टक्के कर लावला आहे असे सागून हेच भाजपचे देश आणि जनतेवरील प्रेम आहे का? असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान ज्या ठिकाणी भेट देतात तिथलेच रस्ते दुरूस्त केले जातात, अन्य ठिकाणचे खराब झालेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. या दयनीय रस्त्यांवरून दररोज ये-जा करून हाडे मोडल्याने करदात्यांचा पैसा पूर्णपणे नाल्यात जात आहे. लोकशाहीत कोणीही करदात्यापेक्षा वरचढ नसतो. राजकिय नेत्यांना राजे असल्यासारखी वागणूक देणे आपण थांबवले पाहिजे, असेही प्रकाशराज म्हणाले.