तीन वर्षांत भारतीय संघ 65 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीने पहिल्यांदाच महिला क्रिकेटसाठी पुढील तीन वर्षाचे एफटीपी (फ्युचर टूर्स प्रोग्राम) तयार केले असून मे 2022 ते एप्रिल 2025 या कालावधीत भारतीय महिला संघाला एकूण 65 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
मंगळवारी आयसीसीने तीन वर्षांचे कॅलेंडर जाहीर केले असून या तीन वर्षात एकूण 301 (7 कसोटी, 135 वनडे, 159 टी-20) सामने खेळविले जाणार आहेत. त्यापैकी भारतीय महिला संघाला इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 कसोटी आणि 27 वनडे व 36 टी-20 सामने या अवधीत खेळावे लागणार आहेत. एफटीपीची सुरुवात मे महिन्यापासून झाली असल्याने भारताने त्यापैकी 3 वनडे व 3 टी-20 सामने लंकेविरुद्ध याआधीच खेळले आहेत. या यादीप्रमाणे न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, आयर्लंड हे संघ भारत दौऱयावर येणार आहेत तर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व लंका (झालेली मालिका) व बांगलादेश यांच्या दौऱयावर जाणार आहे.
या कालावधीत एक महत्त्वाची मालिका होणार आहे, ती म्हणजे सदर्न स्टार्सविरुद्ध पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका. 2023-24 च्या उन्हाळी मोसमात ऑस्ट्रेलियन महिला संघ भारत दौऱयावर येणार असून त्यात 1 कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळविले जातील. त्यानंतर भारतीय संघ परतीचा दौरा 2025-26 च्या हिवाळय़ात करणार आहे. या दौऱयातही एक कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामने घेतले जातील. या कालावधीत होणाऱया 7 कसोटीपैकी इंग्लंड महिला संघाला सर्वाधिक कसोटी खेळायला मिळतील. त्यांना एकूण 5 तर ऑस्ट्रेलियाला 4, दक्षिण आफ्रिकेला 3 व भारताला 2 कसोटी मिळणार आहेत.
महिला क्रिकेटसाठी हा अत्युच्च क्षण असल्याचे आयसीसीचे क्रिकेट सरव्यवस्थापक वासिम खान म्हणाले. ‘या एफटीपीमुळे भविष्यातील क्रिकेटचा कार्यक्रम निश्चित झाला असून त्याच्या रचनेसाठी बेस मिळाला असल्याने आगामी वर्षात त्यात निश्चितच प्रगती होईल,’ असे ते म्हणाले.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये होणाऱया विश्वचषकाआधी 2022-25 महिला चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघ सर्वसाधारणपणे 3 द्विदेशीय मालिका खेळेल. या मालिकासोबतच अनेक टी-20 मालिकाही खेळविल्या जातील. काही संघांनी यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासही मान्यता दिली आहे. ‘या टी-20 सामन्यांचा संघांचे मानांकन ठरविण्यासाठी उपयोग होणार असून त्याआधारे आयसीसी स्पर्धेसाठी पात्रता निश्चित करता येणार आहे,’ असेही आयसीसीने म्हटले आहे.